| उरण | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील दिघोडे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची इमारत सध्या मृत्यूचा सापळा बनली आहे. या धोकादायक गळक्या इमारतीत विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. हे विदारक वास्तव आता समोर आले असून सुमारे 60 वर्षांची ही जीर्ण इमारत कधीही कोसळू शकते, असा गंभीर धोका असतानाही प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे धोकादायक व गळक्या शाळेच्या इमारतीकडे राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे लक्ष केंद्रित करतील का, असा सवाल सध्या विद्यार्थी करत आहेत.
दिघोडे गावातील मूलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ग्रामस्थांनी शासनाच्या देखरेखीखाली रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीची उभारणी केली होती. या शाळेत शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी हे उच्च पदावर पोहचून त्यांनी समाजहिताची कामे केली आहेत. आज त्याच प्राथमिक शाळेच्या इमारतीत पहिली ते चौथीच्या वर्गात एकून 117 विद्यार्थी अभ्यासाचे धडे गिरवत आहेत. अशा शाळेच्या प्रत्येक वर्ग खोल्यांची दुरवस्था झाली असून पावसाळ्यातील गळक्या शाळेचे कौलारू छप्पर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरी राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भूसे तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी या शाळेच्या इमारतीकडे लक्ष केंद्रित करून नव्याने इमारतीचे बांधकाम करण्यासाठी शासनस्तरावर पुढाकार घ्यावा, अशी मागणी पालक वर्गाकडून करण्यात येत आहे.







