लहानग्यांच्या किमयेतून उगवणार शेकडो रोपटी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोणत्याही फळांच्या बियांना रुजण्यासाठी केवळ मातीची ऊब पुरेशी असते. मात्र, मानवी हस्तक्षेपामुळे ही मातीही त्यांच्या नशिबी येत नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत या बियांना ‘सीड बॉल्स’च्या रुपाने कृत्रिम पोषण आवरणाचा आधार देऊन वनीकरणाची चळवळ माणुसकी प्रतिष्ठान आणि गोल्ड कोस्ट हौसिंग सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आली आहे. काही दिवसांवर पाऊस ठेपला असल्याने हे ’सीड बॉल्स’ तयार करण्याचे काम सध्या जोरात सुरु आहे. वनसंपदा संपवण्यासाठी हजारो टोळ्या कार्यरत आहेत, तशाच वनसंपदा जगवण्यासाठी आणि निर्माण करण्यासाठी तितक्याच किंबहुना त्यापेक्षाही अधिक हात कार्यरत आहेत. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माणुसकी प्रतिष्ठान व गोल्ड कोस्ट हौसिंग सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सीड बॉलची निर्मिती करण्यात आली आहे.
जागतिक तापमान खूप प्रमाणात वाढत असताना एका बाजूने झाडांची कमतरता भासत आहे, याचा विचार प्रत्येकाने करून कोणत्याही मार्गाने वृक्षारोपण, संवर्धन करणे गरजेचे बनले आहे. याचा विचार करून माणुसकी प्रतिष्ठान शाखा अलिबाग व गोल्ड कोस्ट हौसिंग सोसायटी अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने सीड बॉल बनविण्यात आले. अशाच प्रकारे इतरही संस्था किंवा सोसायटी एकत्र येऊन सीड बॉल तयार करून निसर्गात वृक्षांची लागवड करावी व डोंगरांची धूप थांबण्याचे एक प्रकारे प्रयत्न करावे, असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांनी सोसायटीच्या सर्व लहान मुलांना सीड बॉल कसे बनवायचे व याचे महत्त्व सांगून प्रत्यक्ष 550 सीड बॉल सर्वांनी बनवले. लहान मुलांना आतापासूनच सामाजिक कार्याची गोडी कशी लागेलं याबद्दल मार्गदर्शन केले. गोल्ड कोस्ट सोसा. शिवनगर चेंढरे मधून अध्यक्ष योगेश घरत व टीम तसेच माणुसकी प्रतिष्ठान शाखा अलिबागकडून अध्यक्ष भूषण जंजिरकर, उपाध्यक्ष श्वेता घरत, खजिनदार गौरव माळी, संपर्कप्रमुख भूपेंद्र पाटील, वसंत जंजिरकर व सोसायटीमधील लहान मुले उपस्थित होती.
असे बनतात सीड बॉल
प्रतिकूल परिस्थितीत वनीकरणाचा विचार रुजवायचा असेल तर त्यासाठीची पद्धतीही बदलावी लागणार आहे. त्याच अनुषंगाने बियांची रुजूवात करण्यासाठी ’सीड बॉल्स’ ही अत्यंत सोपी, स्वस्त आणि उपयुक्त संकल्पना आहे. आपण जी फळे खातो, त्यांच्या बिया इतरत्र न टाकता त्यांचा संचय करून त्या सुकविण्यात येतात. त्यानंतर माती व शेणखत किंवा गांडूळ खत एकत्र करून त्यामध्ये सुकलेल्या बिया एकत्र करून लाडूसारख्या आकाराचे सीड बॉल तयार केले जातात. ते बॉल पुन्हा सुकविण्यात येतात. सुकल्यानंतर हे सीड बॉल पाऊस पडून गेल्यावर जंगल किंवा माळरानात ठिकठिकाणी ठेवण्यात येतात. काही दिवसांनी त्याला अंकुर फुटून वृक्षात रूपांतर होईल. या सीड बॉलमुळे यातील बिया खराब होत नाहीत आणि त्या बिया जनावरेसुद्धा खात नाहीत.