| मुंबई | प्रतिनिधी |
पदरावती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा.. कसं काय पाटील बरं हाय का, बर हाय का, काल का ऐकल ते खरं हाय का… या ठसकेबाज लावणीची ओळ कानावर पडली की आजही मराठी माणसांच मन मोहरुन निघत. ग.दि.माडगुळकर यांच्या लेखणीतून साकारलेल्या या ठसकेबाज लावण्यांना आपल्या ठसकेबाज आवाजात सादर करीत मराठी रसिकांच्या ह्दयावर अधिराज्य गाजविणार्या ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण (वय 92) यांचे शनिवारी (दि.10) निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील एक घरंदाज लावणी गायिकेच्या युगाचा अंत झाला आहे.
सुलोचना चव्हाण आणि ठसकेबाज लावणी हे जणू समीकरणचं महाराष्ट्रात दृढ झालंय. पाच-सहा दशके आपल्या ठसकेबाज लावण्यांनी सुलोचनाबाईंनी अवघ्या महाराष्ट्राला जणू वेडचं लावलं. लावणी, तमाशा ही तर पुरुष संस्कृतीत मोडणारी कला. पण सुलोचनाबाईंनी याच लावणीला घरंदाजच बनवून टाकले. त्यांच्या या लावणीचे वेड केवळ पुरुषांनाच नव्हे तर तमाम महिला वर्गाला लावले आहे.
लावणी आणि सुलोचना ताईंचे वेगळेच नाते होते. मराठी चित्रपटसृष्टीत ठसकेबाज लावणी गात त्यांनी एक वेगळीच भूरळ श्रोत्यांना घातली होती. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.