शंकरराव म्हसकर, ज्येठ नेते, रोहा
1970 च्या सुमारास रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमध्ये विविध उद्योग सुरू झाले. या औद्योगिक वसाहतीमध्ये प्रामुख्याने रासायनिक कारखाने असल्याने त्याचे दुष्परिणाम हळूहळू दिसू लागले होते. या कारखान्यांतून सोडण्यात येणार्या सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता कुंडलिका नदीत ते सोडल्यामुळे नदीचे पाणी व शेतजमीन प्रदूषित झाली होती.
धाटाव औद्योगिक वसाहतीचे दुष्परिणाम दिसू लागल्याने स्थानिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. कुंडलिका नदीच्या पूर्व आणि पश्चिम खोर्यातील सुमारे 32 गावांना या प्रदूषणाचा फटका बसला होता. औद्योगिक वसाहत येण्यापूर्वी पिण्यायोग्य व शेतीयोग्य असलेले कुंडलिकेचे पाणी दूषित झाल्याने मासेमारी बंद झाली. पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित झाले. कसदार शेतीदेखील नापिक होऊ लागली होती. अखेर 1986 साली तत्कालीन जि.प. अध्यक्ष व श्रमजीवी जनतेचे नेते भाई प्रभाकर पाटील, मच्छिमार नेते आमदार भाई बंदरकर यांच्या नेतृत्वाखाली औद्योगिक वसाहतीच्या सांडपाणी वाहून नेणार्या वाहिनीला ‘बुच मारो’ आंदोलन करण्याचा निर्णय शेकाप नेत्यांनी घेतला. तेव्हा रोहा तालुक्यातील शेकापचे नेते व्ही.टी. देशमुख, शंकरराव म्हसकर, महादेवबुवा महाबळे, तेव्हाचे खारगाव ग्रामपंचायत सरपंच एकनाथ मळेकर यांनी या सांडपाणी वाहून नेणार्या वाहिनीला आरे बुद्रुक गावाजवळ पारंग्याच्या झाडाचे बूच मारून औद्योगिक वसाहतीमधून कुंडलिका नदीत जाणारे सांडपाणी रोखले होते. एमआयडीसी कार्यालयावर शेकापच्या वतीने विराट मोर्चा नेण्यात आला. बाधित गावांना एमआयडीसीच्या माध्यमातून मोफत पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेकाप नेते भाई प्रभाकर पाटील यांनी तेव्हा केली होती.
या आंदोलनाची शासनाला दखल घ्यावी लागली. शेकापच्या या आंदोलनामुळे आरे बुद्रुक येथे सोडण्यात येणारे सांडपाणी पुढे वाहून नेत समुद्रात सोडण्यासाठी शासनाने 1 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानंतरदेखील अनेकवेळा शेकापने या गावांचा पाणीप्रश्न सुटावा यासाठी वारंवार मोर्चे व आंदोलने केली. शेकाप आमदार मीनाक्षी पाटील व आमदार पंडित पाटील यांच्या कार्यकाळात या बाधित गावांना पाणीपुरवठा करणारी योजना कार्यान्वित झाली. सांडपाण्यामुळे बाधित झालेल्या शेतीची नुकसानभरपाई आज या भागातील शेतकर्यांना मिळत आहे. हेदेखील शेकापच्या लढ्याचेच यश असल्याची आठवण ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर यांनी पक्षाच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने जागवली आहे.