वाहनचालकांना करावी लागते कसरत
। पाली-बेणसे । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील मुख्य मार्गावर सध्या मोकाट गुरांच्या समस्येने डोके वर काढले आहे. शिहू नागोठणे पोयनाड मार्गावर ठिय्या मांडून बसणारी व रास्ता रोको करणारी गुरे प्रवाशी, वाहनचालक व नागरिकांसमोर डोकेदुखी ठरत आहे. हा मार्ग वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावरुन सातत्याने वाहनांची वर्दळ सुरु असते. रस्त्यातील जिवघेण्या खड्ड्यांमुळे हा मार्ग नेहमीच चर्चेत राहिला आहे. अशातच या मार्गावर मोकाट गुरांचा सातत्याने जनू रास्ता रोको होत असल्याने वाहनचालकांसह प्रवाशी अक्षरशः हैराण झाले आहेत. मोकाट गुरांचे जथ्थे दिवसा व रात्री या मार्गाच्या मधोमध ठाण मांडत असल्याने जिवघेण्या अपघाती घटनांना निमंत्रण मिळत आहे. या मार्गावर रस्त्यात बसलेल्या गुरांना धडकून अनेकदा अपघाती घटना घडल्या आहेत. या मार्गावर गुरांच्या झुंज लागत असल्याने प्रवाशांना याचा अधिक धोका जाणवू लागला आहे. त्यामुळे गुरे मालकांनी आपापली गुरे मोकळी न सोडता त्यांची योग्यप्रकारे निगा राखावी अशी मागणी प्रवाशी व वाहनचालकांमधून जोर धरत आहे. शिहू नागोठणे परिसरात मोकाट गुरांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या मार्गावरील मोकाट गुरांची वाढती समस्या डोकेदुखी ठरत आहे. भररस्त्यात ही गुरे ठाण मांडून बसत असल्याने वाहतुक कोंडीची समस्या देखिल निर्माण होताना दिसत आहे. तर रात्रीच्या वेळी मोटारसायकलस्वार व वाहनचालकांना रस्त्यात बसलेली गुरे दिसत नसल्याने अनेकदा अपघाती घटना घडल्या आहेत. तसेच अवजड वाहनांच्या धडकेत गुरांचा बळी जाण्याची देखिल शक्यता असते. अशातच वाहनचालकांनी कितीही हॉर्न वाजविला तरी मोकाट गुरे जागची हालत नसल्याने यातून वाट कशी काढायची असा प्रश्न वाहनचालकांसमोर उभा राहत आहे. मोकाट गुरांचे मालक व शेतकरी गुरांचा वापर करून काम झाल्यावर बेफिफिकरपणे वागत आहे. रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्ग, पाली खोपोली महामार्ग, खोपोली पेण अलिबाग मार्ग, शिहू नागोठणे पोयनाड तसेच वाकण पाली खोपोली मार्गावर मोकाट गुरांची समस्या गंभीर झाली आहे.
- मोकाट जनावरे रस्त्यावर येत असल्यामुळे वाहनचालकांना अडथळा येतो. तसेच रात्रीच्या वेळी रस्त्यावरील मोकाट जनावरे न दिसल्यामुळे बर्याचदा अपघात होतात. तसेच मोठ्या वाहनांची धडक लागून गुरे देखिल मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे मोकाट फिरणार्या या जनावरांना गुरे मालकांनी गुरे मोकाट सोडू नये. त्यांची चारापाण्याची व्यवस्था योग्य ठिकाणी करण्यात यावी.