| मुंबई | प्रतिनिधी |
ज्या-ज्या वेळी शिवसेनेवर आघात झाले, तेव्हा शिवसेना दसपट मोठी होते. ठाण्यात चिडीचूप होईन, असे दाखवले गेले. पण तिथे चिडून उठले आहेत. ठाण्यात सभा लावा, मी आलोच म्हणून समजा, अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या.
गेले 2 ते 3 महिने मी मुख्यमंत्रीपद सोडलं तेव्हापासून एकही दिवस असा नाही की लोकं शिवसेनेत येत नाहीत, राजकारणामध्ये संबंध नाही असे लोक, तसंच वेगवेगळ्या धर्माचे लोक आमच्या सोबत येत आहेत. सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की तुम्ही लढा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. प्रत्येक वेळी सांगत आलो की माझं काय होणार, शिवसेनेचं काय होणार, हे काय होणार हे ठरवणारे तुम्ही आहात, पण देशाच्या लोकशाहीची काळजी आपल्याला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
जाहीर सभा घ्यायचीच आहे. पोहरदेवीच्या दर्शनाला यायचं आहे, तारीख तुम्ही ठरवा. घाईघाईने निवडणूक आयोगाकडे जाऊन आमचं नाव आणि चिन्ह गोठवलं. ठीक आहे पण मी माझं नाव आणि चिन्ह घेऊन पुढे जात आहे. जे गेलेत ते स्वतः लढले नाहीत, भाजपला पुढे केलं, असा आरोप ठाकरेंनी केला.
सध्या माझी भूमिका शिक्षकासारखी झाली आहे. कारण बोलणारा मी एक, आणि ऐकणारे विद्यार्थी खूप आहेत. पोहरा देवीला मेळावा घ्यायचे जाहीर केले आहे. आता मी ठाण्यात पण सभा घेईन.
उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख
कोणतेही शहर लोकप्रतिनिधींच्या शिवाय राहणे योग्य नाही. यांना निवडणूक लांबवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण त्यांना आपले काम लोकांच्या मनातून पुसायचे आहे, ते होणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. काही जण म्हणतात तुम्ही विनंती का केली नाही. का करु? तुम्ही आम्हाला संपवायला निघालात, तुम्ही आडवे गेला नसता, तर दसरा मेळावा सोपा झाला असता, असं उद्धव ठाकरे म्हणाले.