Shivrajyabhishek Day: जनसागर नव्हे, हा तर शिवसागर: युवराज संभाजी राजे

रायगडावर शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा
लाखोंच्या संख्येने शिवभक्तांची उपस्थिती

| महाड | उदय सावंत |

“जनसागर नव्हे, हा तर शिवसागर आहे,” असे गौरवोद्गार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी काढावेत, इतक्या प्रचंड संख्येने शिवभक्तांनी शनिवारी (दि. 6) दुर्गराज रायगडावर हजेरी लावली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगड भगवामय झाला होता. मंत्रोच्चार, पालखी सोहळा, सुवर्णमुद्रांचा अभिषेक आणि ‌‘जय भवानी, जय शिवाजी‌’च्या गजरात पार पडलेल्या या सोहळ्याने संपूर्ण गड शिवभक्तांच्या उत्साहाने आणि स्वराज्याच्या अभिमानाने दुमदुमून गेला.


युवराज संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे भोसले तसेच जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या भव्य सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि देशभरातून हजारो शिवप्रेमींनी उपस्थिती लावली होती. यावेळी आ. संजय चव्हाण, आ. अभिजित पाटील, आ. अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमास सकाळी सात वाजता नागारखान्यात युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रारंभ झाला. त्यानंतर राजसदर येथे शाहिरी कार्यक्रम रंगला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे राजसदरावर आगमन झाले. युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सवमूर्तीचा अभिषेक करण्यात आला. तसेच राजसदरेवरील सिंहासनारूढ मूर्तीस सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात आला. यावेळी पोलीस दलाच्या वतीने शासकीय मानवंदना देण्यात आली.

यानंतर युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन केले. शिवराज्याभिषेक पालखी सोहळा जगदीश्वर मंदिरापर्यंत नेण्यात आला. जगदीश्वर मंदिर येथे युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते वारकरी संप्रदायाला पंढरपूर वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान करण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना सामूहिक अभिवादन करण्यात आले.

पारंपरिक ढोल-ताशे, लेझीम, मर्दानी खेळ आणि भगव्या पताकांनी सजलेल्या मिरवणुकीने शिवभक्तांमध्ये विशेष उत्साह निर्माण केला. दुपारच्या सत्रात पोवाडे, कीर्तन, शिवचरित्रावरील व्याख्याने तसेच विविध लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमांना शिवभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पारंपरिक वेशभूषेतील युवक-युवती, मावळे आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहभागामुळे संपूर्ण रायगड परिसर शिवकालीन वातावरणाने भारावून गेला होता.

सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन केले होते. शिवप्रेमींसाठी मोफत बससेवा, अन्नछत्र, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सुविधा, स्वच्छता व्यवस्था, सावलीसाठी मंडप तसेच आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. किल्ल्यावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवून सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली.

स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देणारा आणि शिवरायांच्या विचारांचा जागर करणारा हा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. दुर्गराज रायगडावर पुन्हा एकदा शिवकालीन तेज, शौर्य आणि स्वाभिमानाचा जागर अनुभवायला मिळाला.

Exit mobile version