| कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यात अनेक ठिकाणी तसेच समुद्र किनार्यावर गेल्या अनेक दिवसांपासून विशेष करून सकाळच्या वेळेत भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. यामुळे पर्यटक व नागरिकांची डोकेदुखी ठरत असून याकडे शासनाच्या संबंधित तसेच नगरपरिषदेच्या असलेल्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त होत आहे. त्यावर योग्य ती उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून जोर धरीत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून समुद्र किनारी सकाळच्या वेळेत भटके कुत्रे टोळक्याने फिरताना दिसतात. त्यामुळे सकाळच्या वेळेत समुद्र किनारी फिरायला (मॉर्निंग वॉकला) जाणार्या नागरिकांची व पर्यटकांची डोकेदुखी ठरत आहे. यापुर्वी देखील श्वानदंशाच्या अनेक घटना घडल्या आहेत. नुकत्याच नांदगावमध्ये तीन जणांना तर मुरुडमध्ये देखील श्वानदंश झाल्याच्या घटना ताज्या असून समुद्रकिनारी भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे.