खते, बियाणे विक्रीवर करडी नजर

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांवर होणार कारवाई

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात बियाणे, खते व कीटकनाशके उपलब्ध व्हावीत यासाठी रायगड जिल्हा परिषद कृषी विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील परवानाधारक विक्रेत्यांवर पथकांमार्फत लक्ष ठेवण्यात येत असून, शेतकऱ्यांची फसवणूक किंवा आर्थिक लूट करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

मे महिना संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून जिल्ह्यात लवकर पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या शेती मशागतीच्या कामात व्यस्त झाले आहेत. बांधबंदिस्ती, गवत काढणे, पालापाचोळा गोळा करणे, राब जाळणे आदी कामांना वेग आला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी भात बियाणे आणि खतांची खरेदी सुरू केली आहे.

भात लागवडीसाठी शेतकऱ्यांना वेळेत बियाणे आणि खते उपलब्ध व्हावीत यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील परवानाधारक विक्रेत्यांकडे पुरवठा सुरू केला आहे. रायगड जिल्ह्यात सुमारे 91 हजार 521 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. यंदा कृषी विभागाने 73 हजार हेक्टरवर भातलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

जिल्ह्यात दोन हजार 811 हेक्टर नाचणी लागवडीचे क्षेत्र असून, यावर्षी दोन हजार 550 हेक्टरचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी रायगड जिल्ह्यास एक एप्रिल ते 30 सप्टेंबर या कालावधीत 14 हजार मेट्रिक टन रासायनिक खतांचे आवंटन प्राप्त झाले आहे. यात 11 हजार टन युरिया, 700 टन डीएपी आणि एक हजार 500 मेट्रिक टन मिश्र खतांचा समावेश आहे. आतापर्यंत एक हजार 687 मेट्रिक टन खतांचा पुरवठा झाला असून खरीप हंगामात टंचाई निर्माण होऊ नये म्हणून एक हजार 120 मेट्रिक टन संरक्षित साठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी 938 मेट्रिक टन साठा उपलब्ध करण्यात आला आहे.
बियाण्यांच्या बाबतीत जिल्ह्यासाठी 16 हजार 950 क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. यात 16 हजार क्विंटल सुधारित आणि 60 क्विंटल संकरीत भात बियाणांचा समावेश आहे. महाबीजसह विविध खासगी कंपन्यांकडूनही बियाण्यांचा पुरवठा केला जाणार आहे. आतापर्यंत चार हजार 333 क्विंटल बियाणे उपलब्ध झाली असून, आवश्यकतेनुसार आणखी पुरवठा केला जाणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, जिल्ह्यात बियाणे, खते आणि किटकनाशकांचा अनधिकृत साठा, जादा दराने विक्री किंवा गैरवापर आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. सध्या जिल्ह्यात 188 बियाणे विक्रेते, 240 खत विक्रेते आणि 136 कीटकनाशक विक्रेते परवानाधारक आहेत. या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी कृषी विभागाने जिल्हास्तरावर विशेष पथके तयार केली असून त्यांच्यामार्फत नियमित तपासणी सुरू करण्यात आली आहे.

खते, बियाणे किंवा किटकनाशकांच्या विक्रीदरम्यान शेतकऱ्यांची अडवणूक, फसवणूक किंवा आर्थिक लूट होत असल्यास संबंधितांनी तात्काळ तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version