महामार्गावर जिव धोक्यात घालून विद्यार्थ्यांची पायपीट
अवजड वाहनांच्या धडकेची भीती
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
ऑक्टोबर महिन्यापासून इयत्ता 5 वी पासून पुढील इयत्तांच्या शाळा नियमित सुरू झाल्या खर्या मात्र एसटी संपाने विद्यार्थ्यांच्या अध्यनाला ब्रेक लागला आहे. एसटीचा संप असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना अनेक समस्या व अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गलगत असणार्या शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी व येण्यासाठी एसटी बसचा प्रवास विद्यार्थ्यांना सोयीचा पडतो, मात्र आता एसटी बंद असल्याने परिणामी रखरखत्या उन्हात विद्यार्थी कोसो दूर पायी चालत ये-जा करीत आहेत, शिवाय महामार्गावरील अवजड वाहनांची ठोकर बसून अपघात होण्याचा धोका देखील वाढला आहे. त्यामुळे लवकरात लवकर एसटी बस सेवा सुरू करावी अशी मागणी विद्यार्थी पालक व शिक्षक वर्गातून जोर धरत आहे.
जिल्ह्यातील दूर गावावरून आदिवासी वाड्यापाड्यावरून येणार्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी व घरी जाण्यासाठी कित्येक किमीची खडतर पायपीट करावी लागत आहे. यामुळे श्रम व वेळ वाया जात आहे. डोंगर दर्यांनी वेढलेल्या रायगड जिल्ह्यात अनेक गावे वाड्या व वस्त्या दुर्गम भागात आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी एसटीचाच आधार आहे. मात्र सध्या संपामुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोहचता येत नाही आहे. शिवाय रानावनातील व खडतर रस्त्यावर चालत शाळेत जाणे व तेथून पुन्हा घरी येणे धोकादायक व जिकरीचे देखील आहे. तसेच काही मुले चालण्याचा कंटाळा करतात दमतात देखील. त्यामुळे शाळेत येत नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांची अनुपस्थित वाढत आहे. आणि त्यांचा अभ्यास देखील बुडतो. कुंडलिका विद्यालयातील शिक्षक राम मुंढे यांनी सांगितले. बस नसल्याने कित्येक किमीची पायपीट, शिवाय खाजगी वाहनाने जाणे खर्चिक असल्याने विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत. एसटी बस नसल्याने मुलांना पायी शाळेत जावे लागते त्यामुळे त्यांना खूप त्रास होतो. काही मुलांची शाळा बुडत आहे. त्यामुळे मुलांची चिंता वाटत आहे. म्हणून परिवहन मंडळाचा संप लवकर मिटणे गरजेचे आहे असे पालक रमेश पवार यांनी सांगितले.
अनेक विद्यार्थ्यांना शाळेत व घरी पोहचण्यासाठी 3-4 किलोमीटर पेक्षा अधिक पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खूपच त्रास सहन करावा लागतोय. संप चालू असल्याने गावात सकाळी व संध्याकाळी येणार्या बसही बंद आहेत. त्यामुळे प्राथमिक, माध्यमिक व कॉलेजमध्ये जाणार्या विद्यार्थ्यांचे खूपच हाल होत आहेत. लवकर संप मिटला पाहिजे.
अनिल राणे, सचिव, प्राथमिक शिक्षक समन्वय समिती, सुधागड
मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची खूप वर्दळ वाढले, आम्ही उन्हात पायी चालत येतो जातोय, महामार्गावरची झाडे तोडलीत, उन्हाच्या काहिलीने जिव नकोसा होतोय.
सुमित मढवी, विद्यार्थी
एसटी बसच्या संपामुळे दूरच्या गावावरून येणार्या विद्यार्थ्यांची प्रचंड परवड व गैरसोय होत आहे. याबरोबरच वेळ व श्रम देखील खूप लागत आहेत. याचा मुलांच्या अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. दैनंदिन उपस्थिती अत्यल्प आहे. एसटी बस लवकर सुरू व्हावी ही अपेक्षा.
दिपक माळी, मुख्याध्यापक, माध्यमिक विद्यालय, पाच्छापूर