पशुवैद्यकीय विभागाच्या तातडीने हालचाल
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर गावात अचानक शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडत आहेत. ही बाब पशुवैद्यकीय विभागाच्या लक्षात आल्यानंतर ताबडतोब शुक्रवारी (दि.26) रात्रीपासूनच येथील कोंबड्यांच्या लसीकरणास सुरुवात झाली आहे. मात्र त्यानंतरही कोंबड्या दगावण्याचे प्रमाण कमी झाले नाही. त्यामुळे पशुपालक चिंताग्रस्त झाले आहेत.
याबाबत मंगेश यादव यांनी सांगितले की, काही दिवसांपासून शेतकरी व ग्रामस्थांच्या गावठी कोंबड्यांना मरगळ (झुरून) येऊन त्या अचानक मृत होऊ लागल्या आहेत. आत्तापर्यंत 400 ते 500 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामस्थ व पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे. ही बाब तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत कोकरे यांना सांगितल्यावर ते व त्यांचे सहकारी चंद्रकांत बरगे व प्रशांत वारगुडे यांनी येऊन एका रात्रीत 200 कोंबड्यांना आरडी या औषधाचे डोस दिले.
यावेळी पोलीस पाटील सुनील पोंगडे, ग्रामस्थ मारुती यादव, नितीन यादव यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले. मात्र दुसर्या दिवशी डोस दिलेल्या बहुसंख्य कोंबड्या दगावल्या आहेत. अचानक कोंबड्या दगावल्याने पशुपालक हैराण झाले आहेत.
वावळोली गावातील इतर कोंबड्यांना लागलीच आरडी डोस देण्यात आला आहे. इतरही गावांत लसीकरण करण्यात येणार आहे. कोंबड्यांचा मृत्यू नक्की कशाने झाला आहे, हे सांगता येणार नाही. शवविच्छेदन केल्यावरच मृत्यूचे कारण कळू शकेल. आजारी कोंबड्या असलेल्या पशुपालकांनी ताबडतोब पशुधन विकास विभागाकडे संपर्क साधावा. तातडीने येथील कोंबड्यांचे लसीकरण करण्यात येईल.
– डॉ. प्रशांत कोकरे, पशुधन विकास अधिकारी, सुधागड
कोंबड्यांची काळजी
पावसाळ्यात कोंबड्या अचानक झुरणे, भिजणे, किंवा माहिती नसलेल्या कारणामुळे आजारी पडणे आणि तणाव यामुळे देखील कोंबड्यांचा मृत्यू होऊ शकतो. यासाठी पशुपालकांनी कोंबड्या सुरक्षित खुराड्यात ठेवणे गरजेचे आहे. तसेच कोंबड्यांना स्ट्रेस रिलीव्हन्ट देणे गरजेचे आहे. पशुधन विभागाकडून कोंबड्यांना लस, टॉनिक व औषधी पावडर देखील दिली जाईल.