पत्रकार परिषदेत राग झाला अनावर
| अलिबाग | प्रतिनिधी |
सोयीनुसार राजकारण करून पक्ष बदलणारे तटकरे असे विधान अलिकडेच राजकिय नेत्यांनी केले होते. त्यावर स्पष्टीकरण देताना खासदार सुनील तटकरे यांना नैतिकतेची आठवण झाली. पत्रकारांनी पक्षीय फूट आणि शेकापची आघाडीबद्दल विचारलेले मार्मिक प्रश्न खासदारांना चांगलेच झोंबले. पक्षीय फुटीबाबतच्या प्रश्नावर त्यांचा पारा चढला. असा प्रश्न विचारण्याची तुम्हाला नैतिकता नाही, असे सांगत त्यांनी प्रश्नांवर पडदा टाकला.
शेतकरी कामगार पक्षाने 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये केलेल्या सहकार्यामुळेच मी रायगड लोकसभा मतदार संघाचा खासदार होऊ शकलो. हे मी आज आणि भविष्यातही मान्य करेन. शेतकरी कामगार पक्षाबरोबर 2017 मध्ये रायगड जिल्हा परिषदेमध्ये आघाडी होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शेकाप सोबत होता. यावर पत्रकारांनी आपण शेकापबरोबर आघाडी कायम राहावी, म्हणून आमदार जयंत पाटील यांची भेट घेतली का, असे विचारले असता त्यांचा आवाज चढला. त्यानंतर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील अजित पवार गटाने दुसरा पक्ष तयार केला आहे. भविष्यात अजित पवार गटातील आमदार गट करून बाहेर पडले तर त्यांच्या या धोरणावर तुमचे मत काय, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला तेव्हा मात्र त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी तातडीने पत्रकारांना कडक शब्दात रोखले. असा प्रश्न विचारण्यासाठी काही नैतिकता असावी लागते. चुकीच्या प्रश्नांनी गैरसमज पसरवू नका, असे ते म्हणाले. रायगड लोकसभा राष्ट्रवादी लढविणार का, या प्रश्नावर त्यांनी सोपस्कार उत्तर दिले. अद्याप तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची यासंदर्भात बैठक झालेली नाही. त्या बैठकीत राष्ट्रवादीने लोकसभा लढवावी, असे सांगितले तर मी तयार आहे. परंतु त्यावेळी महायुतीचा घटक पक्ष असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवली जाईल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
पक्ष नाही नेतृत्व बदलले- सुनिल तटकरे राजकारणात आलो तेव्हा बॅरिस्टर अंतुले यांचे नेतृत्व होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेवेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली होतो. आता भविष्यातील राजकीय घडामोडींसाठी अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. यामुळे मी पक्ष बदलला नाही. नेतृत्वासोबत एका निष्ठेने राहिलो, असे खा. सुनील तटकरे म्हणाले. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे तटकरे सोयीनूसार नेतृत्व स्वीकारत असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.