अंबादास दानवेंचं पाच दिवसांसाठी निलंबन

। मुंबई । प्रतिनिधी ।

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु असून अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्यांवरून आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी (दि.1) विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये राडा झाला होता. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका आणि शिवीगाळ केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडून करण्यात येत आहे. यानंतर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वक्तव्यावर भारतीय जनता पार्टीचे आमदार आक्रमक झाले होते. भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच यासाठी आमदार प्रसाद लाड यांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन केलं होतं. त्यानंतर विधानपरिषदेमध्येही सत्ताधार्‍यांनी आक्रमक होत अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे यांनी काही वेळासाठी कामकाज स्थगित केले होते. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरु झाले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत पाटील यांनी अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासंदर्भात सभागृहात प्रस्ताव मांडला. यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे यांनी अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन केलं. तसेच या पाच दिवसांमध्ये अंबादास दानवे यांना सभागृहात येण्यासही बंदी असेल असे ही सांगितले.

Exit mobile version