। पाली । वार्ताहर ।
सुधागड येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणी कामात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने कामाचा खोळंबा होत आहे. कार्यालयात पर्यायी व्यवस्था असलेला इन्व्हर्टर गेली सहा महिन्यापासून बंद पडला आहे. मुख्य सर्व्हर संथगतीने सुरू असल्यान रजिस्ट्रीच्या कामांचा खोळंबा होत आहे. परिणामी, येथे येणार्या नागरिकांना दिवसभर ताटकळत बसावे लागत असून, दिवसभरात फार कमी दस्तांची नोंदणी होत असल्याचे सांगण्यात आले.
दुय्यम निबंधक कार्यालयात दररोज कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. शेती, प्लॉट्स, घर खरेदी-विक्रीच्या कायदेशीर दस्त नोंदणीसाठी या कार्यालयात येणार्यांची संख्या अधिक आहे. दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व कामकाज आता ऑनलाईन झाले आहे. मात्र, ऑनलाईन कामाजासाठी वापरण्यात येणारे मुख्य सर्व्हर कायम डाऊन राहत असल्याने एका दस्त नोंदणीसाठी 20 ते 30 मिनिटांचा वेळ लागत आहे. सर्व्हरमुळे कामांचा वेगही मंदावला असून, पुर्वी दिवसभरात होणार्या शेकडो रजिस्ट्रींची संख्या आता अर्ध्यापर्यंत खाली आली आहे. त्यामुळे दस्त नोंदणीतून मिळणार्या महसूलावरही परिणाम होत आहे. दस्तनोंदणी झाल्यानंतर व्यवहाराच्या ऑनलाईन नोंदी झालेली कागदपत्रे लगेच देणे आवश्यक असताना, यासाठी संबंधितांना दुसर्या दिवशी बोलावले जात आहे.
परिणामी, ग्रामीण भागातून येणार्या नागरिकांना एकाच कामासाठी दोन-दोन चकरा माराव्या लागत आहेत. या कामांचा बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना काम न झाल्यास मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे कार्यालयातील सर्व्हरची गती वाढविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व कामकाज ऑनलाईन झाले. ही चांगली बाब असली, तरी सर्व्हर डाऊन राहत असल्याने एका नोंदणीसाठी तासनतास थांबावे लागत आहे. येथील सर्व्हरची गती वाढविण्यासाठी तसेच विद्युत पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्थेसह संबंधित विभागाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात.
गणेश कानडे, सामाजिक कार्यकर्ते