| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी, घरोघरी नळ कनेक्शन देण्यासाठी शासनाकडून जल जीवन मिशन अभियान सुरु करण्यात आले आहे. ग्रामपंचायतींमधील सर्व सार्वजनिक संस्थाना शुदध व स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे जलजीवन मिशनअंतर्गत पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांचा उद्देश आहे. ग्रामपंचायत स्तरांवरील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता चांगली ठेवणे ही ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे. याअंतर्गत 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत केंद्र शासनामार्फत सुरु करण्यात आलेल्या जल जीवन सर्वेक्षण अंतर्गत स्वच्छ जल से सुरक्षा अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.
या कालावधीत जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांची जैविक व रासायनिक तपासणी करण्यात येणार असून त्याचे अहवाल ऑनलाईन वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यातील स्त्रोतांचे जिओ टॅग करण्यात येणार आहे. तसेच महसूल गाव निहाय पाच महिलांना प्रशिक्षित करण्यात आले असून त्याच्या माध्यमांतून पिण्याच्या पाणी नमुन्यांची जैविक व रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे. याकरिता लागणारे जैविक पाणी तपासणी करण्यात येणारे किट ग्रामपंचायतस्तरांवर वितरीत करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची वर्षातून एक वेळा रासायनिक तपासणी प्रयोगशाळेच्या माध्यमांतून करण्यात येत आहे.
या अभियान कालावधीत गावागावातील पाणी नमुन्याची रासायनिक तपासणी रासायनिक फिल्ड टेस्ट किटच्या माध्यमांतून गावातच करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीने निवड करण्यात आलेल्या महिलांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राखणार आहेत. यासाठी तालुकानिहाय प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरु असून या महिलांना रासायनिक पाणी नमुने तपासणी किटही देण्यात येणार आहे.
डॉ.किरण पाटील
सीईओ, रायगड जि.प.
या अभियांनातर्गत जिल्हयांतील प्रत्येक नळ पाणी पुरवठा योजनांच्या स्त्रोतांची मान्सून पश्चात कालावधीमधील रासायनिक व जैविक तपासणी करणे, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे जिओ टॅग करणे, विशेष ग्रामसभेचे आयोजन करून आपले गाव हर घर जल म्हणून घोषित करणे. तसेच गावपातळीवर पाणी गुणवत्ता विषयक माहितीबाबत जनजागृती पर कार्यक्रमांचे आयोजन करून घराघरात पिण्याचे शुद्ध व मुबलक पाणी उपलब्ध होईल, यासाठी जिल्ह्यांतील प्रत्येक गावाने या अभियानात सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी स्वच्छ जल से सुरक्षा अभियानांच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित जलसुरक्षक, बीआरसी, सीआरसी, अंमलबजावणी सहाय्य संस्था यांना केले आहे.