मुख्यमंत्र्यांचे यंत्रणांना निर्देश
रोजीरोटी बंद नाही, गर्दी टाळण्याचे आवाहन
मुंबई | वृत्तसंस्था |
आपल्याला कोणाचीही रोजी रोटी बंद करायची नाही, पण आरोग्याचे नियम पाळताना हलगर्जीपणा नको, असा इशारा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियम धुडकावणार्यांवर कठोर कारवाईचे निर्देश यंत्रणांना दिले. आपल्याला टाळेबंदी जारी करून सर्व व्यवहार ठप्प करायचे नाहीत, असेही स्पष्ट केले.
अनावश्यक घराबाहेर पडून व नियम पाळण्यात हलगर्जीपणा करून करोनाचे दूत बनू नये, असे आवाहन ठाकरे यांनी नागरिकांना केले आहे. राज्य सरकारने रात्रीची संचारबंदी आणि गर्दी आटोक्यात आणण्यासाठी कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतल्यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की करोनाच्या लढताना दोन वर्षांच्या काळात आपण दोन मोठया लाटा अनुभवल्या आणि काळजीपूर्वक पावले उचलून रोखल्या. मात्र आता नवीन विषाणूच्या संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, म्हणूनच तो किती धोकादायक आहे किंवा नाही, यावर चर्चा न करता या संसर्गाला लवकरात लवकर थोपवणे गरजेचे आहे. अन्यथा आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येऊ शकतो. त्यामुळे वारंवार कृतीगट आणि केंद्रीय आरोग्य विभागाशी चर्चा करून तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्व संबंधितांशी विचार विनिमय करून राज्यात काही निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आपल्याला टाळेबंदी लागू करायची नाही. केवळ कायदे आणि नियम करून अशा आव्हानांचा मुकाबला होऊ शकणार नाही. प्रत्येक नागरिकाने आता ही लढाई अंतिम आहे, अशा निश्चयाने आरोग्याचे नियम पाळायचे आहेत. आपल्याला काम बंद करायचे नाही, तर गर्दी बंद करायची आहे. रोजी रोटी बंद करायची नाही, जीवन थांबू द्यायचे नाही, पण काही बंधने पाळून या विषाणूपासून राज्य कायमचे मुक्त करायचे आहे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
नियम बहुतांश नागरिक पाळतात, पण काही मूठभर नागरिकांच्या नियम न पाळण्याच्या वृत्तीमुळे प्रश्न निर्माण होतो. हे यापुढे चालणार नाही. नियम पाळलेच पाहिजेत अन्यथा संबंधितांवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना आणि पोलिसांना दिले आहेत. हे सर्व आपल्या भल्यासाठीच आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी नमूद केले.