संरक्षक कठडे कमकुवत; प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव-पुणे महत्त्वाच्या राज्य मार्गावर ताम्हिणी घाटात तीव्र उतार व त्यातच अवघड वळणे यामुळे दिवसेंदिवस अपघात घडत आहेत. त्याचबरोबर रस्त्याकडेला असणारे संरक्षक कठडे कमकुवत झाले आहेत. रस्त्याकडेला असणार्या दरडींमुळे पर्यटक प्रवाशांना आपला प्रवास असुरक्षित वाटत असून, या मार्गावर शासन खास उपयायोजना करीत नाही. त्यामुळे या संरक्षित कठड्यामुळे पुणे मार्गावरून कोकणात येणार्या पर्यटक प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. पावसाळा जवळ आला असून, या मार्गाने प्रवास करणार्या पर्यटकांत लक्षणीय वाढ होणार आहे. यामुळे शासनाने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षिततेसाठी पाऊल उचलण्याची गरज आहे.
दिघी-पुणे-बंगळुरू जाणार्या या मार्गावर दिवसेंदिवस वाहतूक वाढत आहे. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला जोडणारा हा जवळचा मार्ग म्हणून पाहिले जाते. या मार्गावरून पर्यटक प्रवासी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. या मार्गावर धोकादायक वळणे व तीव्र उतार असल्याने येणार्या जाणार्या वाहन चालकांना या रस्त्याचा अंदाज येत नाही. तसेच रस्त्याकडेला असणारे संरक्षित कठडे हे कमकुवत झाले आहेत. तर काही ठिकाणी हे कठडे बांधलेले नाही. त्याचबरोबर रस्त्यालगत असणार्या दरडी ह्या विशेषतः पावसाळ्यात कोसळण्याचे प्रमाण वाढते. पावसाळा महिन्यावर येऊन ठेपला असून, या गंभीर प्रश्नांकडे संबंधित खात्याने लक्ष घालून उपयायोजना करणे गरजेचे आहे. ताम्हाणी घाटातील अवघड धोकादायक वळणे काढून सुलभ व पर्यायी रस्ता काढावा तसेच ज्या ठिकाणी संरक्षक कठडेंची आवश्यकता आहे. तेथे संरक्षक कठडे उभ्या करावेत व कमकुवत झालेले संरक्षण कठडे नव्याने बांधावेत, अशी मागणी नागरिक, प्रवासी व पर्यटकातून सतत होत आहे.