ठाकरे गट दोन पाऊलं मागे? लोकसभेसाठी ठरला ‘हा’ माविआ फॉर्म्युला

। मुंबई । प्रतिनिधी ।

लोकसभा आणि विधानसभेतील दुसऱ्या क्रमांकाच्या जागेवर येणाऱ्या निवडणुकीत लक्ष द्या, असे स्पष्ट आदेश शरद पवारांनी दिलेत. अशातच लोकसभेसाठी समसमान 16-16-16 जागा लढविण्याच्या फॉर्म्युल्यावर ठरल्याची चर्चा सुरु झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बुधवारी (दि.17) शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा झाली. त्यात गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार क्रमांक दोनवर होते, त्या जागांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळं सुरुवातीला 20 जागांवर दावा करणारा ठाकरे गट दोन पऊलं मागे गेला का? असा सवाल उपस्थित होत आहे. सुरुवातीला ठाकरे गटाकडून लोकसभेच्या २० जागांवर दावा करण्यात आला होता. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून समान जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमिवर मविआची एक बैठकही पार पडली.

यावेळी लोकसभेसाठी समसमान 16-16-16 जागा लढविण्याच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच काँग्रेस या फॉर्म्युल्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. याचा मोठा फटका शिवसेनेच्या ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे. कारण 2019 मध्ये राज्यातल्या 288 विधासनसभा मतदारसंघात 48 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला दुसऱ्या नंबरची मते मिळाली.

पण संजय राऊत यांनी लोकसभेच्या जागावाटपाबाबत मोठा दावा केला आहे. राऊत म्हणाले, जागावाटपाबाबत अद्याप कोणताही फॉम्यूर्ला ठरलेला नाही. समान जागा वाटपाबाबतही काही ठरलेलं नाही. आम्ही 18 जागा लढवणार आहोत. आमचे 18 खासदार विजयी होतील.

Exit mobile version