100 रुपये किलो दराने विक्री
शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण
। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
मुरूड येथील बाजारपेठेत मुबलक प्रमाणावर पोपटीसाठी लागणार्या गावठी कडव्या वालाच्या शेंगा दररोज उपलब्ध होत असून, रुपये 100/- किलोने विक्री केल्या जात आहेत. यातून शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ होत असून, समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
खारवण जमिनीवरील वालाच्या शेंगा किंवा वाल दीर्घकाळ टिकाऊ असतात. खारआंबोली, शिघ्रे, वाणदे, तेलवडे, जोसरांजन, नागशेत, वावडुंगी आदी गावांतील वाल रुचकर आणि टिकाऊ असतो अशी माहिती मार्केट मध्ये फिरताना मिळाली. या गावाजावळून एकदरा, राजपुरी समुद्र खाडी चे पाणी भरतीला येत असते.त्यामुळे जमिनीत खारपणा येत असतो. अशा शेंगा वाळवून तयार झालेला वाल चवीला खार नसून अधिक रुचकर असतो.
हिवाळ्यात पोपटीची लज्जत अधिक असते. अवकाळी पावसामुळे मुरूड तालुक्यात वाल पिकास मोठी हानी पोहचली होती; तरीही शेतकरी बांधवांनी पुन्हा वाल पिकाकडे परिश्रमपूर्वक लक्ष देऊन वाल शेती फुलवली. त्यामुळे वालाच्या मुबलक शेंगा पर्यटक आणि मुरूडकरांना मिळू लागल्याचे दिसून येत आहे. सुकविकेल्या वाल दाण्याचे बिर्ड, आमटी, बटाटे टाकून केलेली सुकी भाजी असे मेनू आता कोकणात दिसून येऊ लागले आहेत. हल्ली गावठी भाज्यांना देखील खूप महत्व आले असून, मुरूड मार्केटमध्ये पोकळा, पालक, वांगी, माठ, छोटी मेथी, कारली, कोथिंबीर, रताळी, भोपळा अशा विविध ताज्या भाज्या किफायतशीर भावात उपलब्ध होत असलेल्या दिसून येत आहेत. आंब्याचा मात्र मागमूस नाही. आरोग्यासाठी गावठी भाज्या सर्वार्थाने महत्त्वाच्या आहेत.