अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकरांचा अर्ज दाखल
। दिलीप जाधव । मुंबई ।
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवनियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी 2 आणि 3 जुलै रोजी बोलावलेले विशेष अधिवेशन एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. आता हे अधिवेशन 3 आणि 4 जुलै रोजी होणार आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार असून, भाजपतर्फे राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी अर्ज दाखल केला आहे.
विधानसभेचे अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना विनंती केली होती, मात्र त्यांना परवानगी देण्यात आली नाही. मात्र, शिंदे सरकार आल्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधान सभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शिंदे सरकारविरोधात शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचे संख्याबळ लक्षात घेता भाजपचे राहुल नार्वेकर सहज निवडणून येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करणार – मुख्यमंत्री शिंदेंचा निर्धार
महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा निर्धार नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. बळीराजा हा आपला मायबाप आहे. त्याला सुखी करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, हे सरकार शेतकर्यांसाठी महत्त्वाची पावले उचलणार आहोत, असेही शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हेच स्वप्न आणि ध्येय आमचं आहे. विकासकामे पूर्ण करायचे आहेत. मेट्रो मार्ग पूर्ण झाल्यास मुंबईतील दळणवळण यंत्रणा सक्षम होईल. शेतकर्यांशी संबंधित जलसंपदा विभागातील अनेक प्रकल्प रखडलले आहेत, ते प्रकल्प मार्गी लागले तर मोठ्या प्रमाणातील पाण्याचे सिंचन होईल. खूप मोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
नवे मुख्यमंत्री शिवसैनिक नाहीत – उद्धव ठाकरे
अडीच वर्षांपूर्वी ज्यांनी शब्द मोडला आणि अशा पद्धतीने पाठीत वार करुन पुन्हा एकदा जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री असे चित्र निर्माण केले. पण, हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही, असे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईतील शिवसेना भवन येथे शिवसेनेचे नगरसेवक, शिवसैनिक यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. तेव्हा शिवेसनेचा मुख्यमंत्री केल्याचे जे चित्र भासवले जात आहे, ते खोटे असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हे आज जे झाले ते तेव्हाच घडलं असतं, तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता. अडीच वर्षांपूर्वी अमित शाह आणि माझ्यात अडीच-अडीच वर्षांसाठी बोलणे झाले होते, हे तेव्हाच केले असते तर सन्मानाने झाले असते. मग त्यांवेळेला नकार देऊन आता असं का केले? हा प्रश्न माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख म्हणाले.