बेलापूर ते मुंबई सेवा
। उरण । वार्ताहर ।
नवी मुंबई ते मुंबईला जोडणार्या देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेचा लोकार्पण गुरुवारी (दि.17) झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री सरबानंद सोनोवाल हे या सोहळ्याला ऑनलाईन उपस्थित होते. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, भाजप आमदार मंदा म्हात्रे, खासदार राजन विचारे या उद्घाटन सोहळयाला उपस्थित होते.
बेलापूर मधून 10 ते 30 इतकी प्रवासी क्षमता असलेली 7 स्पीडबोट तसेच 56 प्रवासी क्षमता असलेली कॅटामरान बोट सेवा देणार आहे. एकूण 8 अशा बोटी आहेत. गुरुवारपासून प्रवाशांसाठी ही वॉटर टॅक्सी सेवा सुरु केली आहे. या बोटीतून बेलापूर येथून दक्षिण मुंबईत भाऊचा धक्का या ठिकाणी जाण्यास फक्त 30 मिनिटे लागतात. आणि कॅटामरान या बोटीने प्रवास करण्यास 40 ते 50 मिनिटे लागतील.
तिकिटांचे दर
स्पीड बोटीचे तिकिट हे प्रति प्रवासी 800 ते 1200 रूपये असून कॅटामरान बोटीचे तिकिट प्रति प्रवासी रुपये 290 रूपये आहे. या बोटी बेलापूर मधून प्रवास सुरू करून भाऊच्या धक्क्याबरोबर एलिफंटा, जेएनपीटी या मार्गावर जातील.