पर्यटकांना डांबून ठेवल्याचा आरोप; दुर्गप्रेमी संघटना आक्रमक
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना दोन आंबे उचलल्याच्या कारणावरून रोखून धरण्याचा आणि दमदाटी केल्याचा आरोप समोर आल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकारांनतर आता पुन्हा गोपाळ गडाच्या मालकीचा वाद उफाळला आहे. या घटनेशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक नागरिक, दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
गोपाळगड हा राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेला ऐतिहासिक किल्ला असून, त्याच्या मालकी हक्काबाबत यापूर्वीही वाद निर्माण झाले होते. शासकीय स्तरावरील त्रुटींमुळे काही काळ या किल्ल्याच्या मालकीसंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. येथील मनेर नामक कुटुंबाने या किल्ल्यावर आपला मालकी हक्क व्यक्त केला होता. किल्ल्याची जागा ही खाजगी असून, त्यावरील सात बारा हा मनेर नामक कुटुंबाचा असल्याचा दावा मागील काही वर्षांपूर्वी करण्यात आला होता.
मात्र, न्यायालयीन प्रक्रियेनंतर या किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा कायम राहिला. त्यामुळे हा किल्ला सर्वसामान्य नागरिक, पर्यटक आणि इतिहासप्रेमींसाठी खुला असल्याचे मानले जाते. मात्र, आता किल्ल्याच्या मालकी हक्काचा वाद पुन्हा सुरु झाल्याने याचा फटका पर्यटकांना बसू लागला आहे. या किल्ला परिसरात झाडावरून पडलेले दोन आंबे पर्यटकांनी उचलल्याने येथील एका आंबा व्यावसायिकाने पर्यटकां बरोबर हुजत घालून किल्ल्याचा दरवाजा लावून पर्यकांना डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला.
याबाबत आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत किल्ल्यावर आलेल्या काही पर्यटकांशी कथित गैरवर्तन झाल्याचा आरोप समोर आल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. दोन आंबे उचलल्याच्या कारणावरून पर्यटकांना रोखून धरण्यात आल्याची चर्चा असून संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. या व्हिडिओमध्ये किल्ल्यावर मालकी हक्क सांगितला जात असल्याचा दावाही केला जात असल्याने वाद अधिकच तीव्र झाला आहे.
घटनेनंतर विविध दुर्गप्रेमी संघटना आणि इतिहासप्रेमींनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. राज्य संरक्षित स्मारक असलेल्या किल्ल्यावर कोणत्याही व्यक्तीचा खासगी मालकी हक्क असू शकत नाही, असे मत व्यक्त करत पर्यटकांना दमदाटी करणे किंवा डांबून ठेवण्याचा प्रयत्न करणे गंभीर स्वरूपाची बाब असल्याचे संघटनांनी म्हटले आहे.
शिवतेज फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. संकेत साळवी यांनी या प्रकरणात प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी केली आहे. राज्य संरक्षित स्मारकावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाची आहे. संबंधित घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी,असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गोपाळगड किल्ल्याशी संबंधित मालकी हक्काचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून या प्रकरणावर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे स्थानिक नागरिक, इतिहास अभ्यासक आणि दुर्गप्रेमी संघटनांचे लक्ष लागले आहे. व्हायरल व्हिडिओची सत्यता, पर्यटकांना रोखून धरण्याच्या आरोपांची वस्तुस्थिती आणि किल्ल्यावरील व्यवस्थापनाचा प्रश्न याबाबत प्रशासनाकडून अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






