सुनील घरत यांनी मिळवला मान
| चौल | प्रतिनिधी |
कोकणातील हापूस आंब्याची जगभर ख्याती आहे. यंदाच्या हंगामातील रायगड जिल्ह्यातून अलिबाग तालुक्यातील चौल विभागातून पहिला आंबा पाठवण्याचा मान चौलमळा येथील आंब्याचे व्यापारी सुनील गणपत घरत यांना मिळाला आहे. सोमवारी नवी मुंबईच्या वाशी येथील फळ बाजारात आंब्याच्या पेट्या दाखल झाल्या.
चौलमळा येथील सुनील घरत यांनी हापूस आंब्याच्या दोन डझनाच्या दहा पेट्या आंबा काढणी करुन कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी-नवी मुंबई येथे बाजारात पाठवल्या. चौल विभागातून मुंबईला पहिला हापूस आंबा पाठविण्याचा मान गेली कित्येक वर्षे सुनील घरत मिळवत आहेत. या आंब्याला डझनाला 800 ते 1500 हजार रुपयांपर्यंत भाव मिळण्याची अपेक्षा सुनील घरत यांनी व्यक्त केली आहे. हवामानबदलाचा मोठा फटका यंदाही आंबा पिकाला बसला असून, उत्पादनात घट होण्याची भीती घरत यांनी व्यक्त केली. वातावरणातील बदलामुळे आंबा पिकावर तुडतुडे (चिकन्या) व थ्रिप्स रोगाचे प्रमाण वाढले असून, वारंवार औषधांची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे औषधांचा खर्च आणि वाढती मजुरी याचा व्यवसायावर परिणाम होत असल्याचे सुनील घरत यांनी सांगितले.