रायगडातील पहिला आंबा मुंबईत रवाना; अलिबागचे वरूण पाटील यांना मिळाला मान

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
यंदाच्या हंगामात रायगड जिल्हयातून मुंबई बाजारात पहिला आंबा पाठवण्याचा मान अलिबाग तालुक्याला मिळाला आहे. अलिबाग तालुक्यातील नारंगी येथील बागायतदार एस. के. मँगोजचे मालक वरूण संजयकुमार पाटील यांनी प्रजासत्ताक दिनी प्रत्येकी दोन डझनाच्या पाच पेटयांची काढणी करून आंबा मुंबई बाजारात पाठवला आहे.

यंदादेखील आंबा बागायतदारांवर निसर्गाने अवकृपा केली आहे. सातत्याने बदलत्या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसतो आहे. अवेळी पडणारा पाऊस , खराब हवामान ,पिकांवर येणारे आजार अशा प्रतिकुल परिस्थितीवर मात करून वरूण पाटील यांनी यशस्वीरित्या आंब्याची काढणी करून जिल्हयातून पहिला आंबा बाजारात पाठवण्याचा मान पटकावला आहे.

हा आंबा त्यांना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी बाजारात पाठवला आहे .जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले यांनी वरूण यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील हंगामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version