भारताची अंतिम फेरीत धडक

बांगलादेशचा नऊ गडी राखून पराभव
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीत बांगलादेशचा नऊ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 96 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 9.2 षटकांत एक गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताकडून तिलक वर्माने नाबाद 55 धावा, तर ऋतुराज गायकवाडने नाबाद 40 धावा केल्या. साई किशोरने तीन, तर वॉशिंग्टन सुंदरने दोन गडी बाद केले. आता भारतीय संघ शनिवारी अंतिम सामना खेळणार आहे.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान बांगलादेशने 20 षटकांत 9 गडी गमावून 96 धावा केल्या. संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर महमुदुल अवघ्या 5 धावा करून बाद झाला. कर्णधार सैफ हसन 1 धावा करून बाहेर पडला. झाकीर अलीने संघाकडून सर्वाधिक 24 धावा केल्या. परवेझने 23 धावांचे योगदान दिले. भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशवर पूर्णपणे वर्चस्व राखले. साई किशोरने 4 षटकात 12 धावा देत 3 बळी घेतले. वॉशिंग्टन सुंदरने 2 बळी घेतले. अर्शदीप सिंग, तिलक वर्मा, रवी बिश्नोई आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

आता सुवर्णपदकासाठी लढत
उपांत्य फेरीत बांगलादेशचा पराभव करून भारताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता भारतीय संघ शनिवारी सुवर्णपदकासाठी सामना खेळणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. यात जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत प्रवेश करेल.

Exit mobile version