पालीत खरेदीसाठी खवय्यांच्या उड्या
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पावसाळा म्हणजे मत्स्य खवय्यांसाठी जणू पर्वणीच. पावसाळ्यात समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे. परिणामी खवय्यांच्या उड्या आता गोड्या पाण्यातील मासळीवर पडत आहेत. हे मासे सध्या मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होत असल्याने खवय्यांना मेजवानी मिळत आहे. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर देखील स्थिर आहेत.
नद्या, तलाव, धरण, पाणवठे, ओढे, ओहळ, शेतात साठलेले पाणी अशा गोड्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मासे सापडत आहेत. त्यामध्ये मळे, शिवडा, कटला, अरलय, वाम, कोलंबी, खवल आदी माशांचा समावेश आहे. या मोसमात सापडणार्या बहुतांश माशांच्या पोटात अंडी सापडतात. त्याला स्थानिक भाषेत पेर किंवा गाबोळी वाले मासे म्हणतात. ही गाबोळी किंवा अंडी खवय्ये अतिशय ताव मारुन खातात. कोळी बांधवांबरोबरच प्रामुख्याने आदिवासी आणि गळभोई समाजातील लोक खुप मेहनतीने हे मासे व चिंबोर्या पकडतात. हे विकुन त्यांना चार पैसे देखील मिळतात. पावसाळ्यात गोड्या पाण्यातील मासे आवडीने खातो असे वर्हाड जांभुळ पाडा येथील नीलेश पवार यांनी सांगितले.
वल्गणीच्या माशांना मागणी
भरपूर पावसानंतर पाणी वाढल्यावर खाडीतील तसेच नदितील मासे शेतातील कमी पाण्यात अंडी देण्यासाठी येतात. यावेळी आलेल्या माशांना पकडण्यासाठी मोठी झुंबड उडते. यालाच उधवण किंवा वल्गणीचे मासे असे म्हणतात.
गोड्या मासे खाण्यासाठी खूप चविष्ट असतात. सध्या सापडणार्या बहुतांश माशांमध्ये हमखास अंडी असतात. त्यामुळेच माशांना खूप मागणी असते. दरवर्षी या हंगामात मासे पकडतो. त्यासाठी जाळे, पाग, आदी साधनांचा वापर करतो.
हितेश भोय, तरूण मासेमार.