। रसायनी । वार्ताहर ।
कोयना प्रकल्पग्रस्तांनी केलेला त्याग शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी शेवटचा लढा दिला जाईल आणि शासन दरबारी न्याय मिळेपर्यंत हा लढा कायम असेल असा ठाम विश्वास अध्यक्ष बळीराम शिंदे यांनी दिला.
अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कार्यकारिणी व निमंत्रितांची सभा नुकतीच संपन्न झाली. त्यावेळी बळीराम शिंदे बोलत होते. यावेळी सातारा, रायगड, ठाणे, रत्नागिरी, पालघर व सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. शासनाने रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त जनतेला विश्वासात न घेता संकलन यादी तयार केली आहे. त्याचप्रमाणे अतिरिक्त जमीन व दुबार जमीन घेतल्याचा आरोप ठेऊन काही खातेदार यांना कायद्याची भीती दाखवून नोटीस बजावली आहे. त्यामुळे कोयना प्रकल्पग्रस्त जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेली साठ वर्षे पदरी निराशाच दिली आहे, असेही शिंदे म्हणाले.