इमारतच कचरा कुंडीचा अड्डा; कार्यालयातच दिव्याखाली अंधार
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
ग्रामीण भागाला स्वच्छतेचा संदेश देणारे अलिबाग पंचायत समितीचे कार्यालय कचरा कुंडीचा अड्डा बनला आहे. इमारतीमध्येच लिफ्टच्या जागेत प्लास्टिक व इतर कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. कचरा टाकण्याची पंचायत अशी अवस्था झाली असून दिव्याखाली अंधार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पंचायत समिती कार्यालयाची इमारती सुसज्ज असावी, यासाठी जिल्हा टपाल कार्यालयासमोर गेल्या दहा वर्षापुर्वी दुमजली इमारत बांधण्यात आली. या इमारतीमध्ये गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, बांधकाम विभाग उप अभियंता असे अनेक कार्यालये आहेत. सध्या या इमारतीमध्ये जिल्हा परिषद, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे कार्यालयदेखील आहे.
पंचायत समितीच्या कार्यालयासह बांधकाम, शिक्षण विभागातील कार्यालयात वेगवेगळ्या शासकिय कामासाठी नागरिकांची वर्दळ असते. बांधलेल्या या इमारतीमध्ये लिफ्टसाठी आरक्षित असलेल्या जागेत प्लास्टिक बाटल्या, व अन्य कचर्याचा ढिगारा मोठ्या प्रमाणात साचला आहे. त्यामुळे ही इमारत कचरा कुंडीचा अड्डाच बनल्याचे दिसून येत आहे.
पंचायत समितीच्या माध्यमातून शासनाच्या योजनां गावांतील वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहचविल्या जातात. विशेष म्हणजे स्वच्छतेचा संदेश पंचायत समितीच्या माध्यमातून गावागावात पोहचविण्यासाठी पंचायत समिती कार्यालय पुढाकार घेत असते. गावांतील स्वच्छता राखण्यासाठी ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांची मदत घेतली जाते. कचर्याचे व्यवस्थापन करण्यासाठीदेखील या कार्यालयामार्फत सांगितले जाते. मात्र, दुसर्या शिकवे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण अशी अवस्था अलिबाग पंचायत समिती कार्यालयाची झाली आहे.
पंचायत समितीच्यामार्फत स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. स्वच्छता न राखणार्या तसेच, कचरा व्यवस्थापनाचे नियोजन न करणार्या ग्रामपंचायतीवर तालुका स्तरावरून अनेकवेळा कारवाईदेखील केली जाते. परंतु पंचायत समितीची अवस्था दिव्याखाली अंधार अशी झाली आहे. याकडे रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड लक्ष देतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.