मतदानातील घट कोणाच्या पथ्यावर
| रायगड । सुयोग आंग्रे ।
रायगड लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील चार आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून 2014 मध्ये शिवसेना, तर 2019 मध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला. पण, 2014 मध्ये पाच लाख 39 हजार 477 व 2019 मध्ये सहा लाख 31 हजार 375 मतदारांनी मतदान केले नाही. या दोन्ही निवडणुकीवेळी तब्बल 11 लाख 70 हजार 852 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. यामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघातील महाड आणि दापोली विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार आहेत. 2014 आणि 2019 या लोकसभा निवडणुकीमध्ये 40 टक्के मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र रायगड लोकसभेमध्ये स्पष्ट आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत कमी झालेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार, या समीकरणाची जुळवाजुळव सुरु झाली आहे.
रायगड जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघासाठी दोन हजार 185 मतदान केंद्रे आहेत. मतदानाची घटणारी टक्केवारी पाहता नागरिकांची मतदानाबाबतची मानसिकता नकारात्मक झालेली पाहावयास मिळत आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या घटणार्या टक्केवारीचा फायदा कोणाला होणार यापेक्षा ही धोक्याची घंटा लक्षात पुढार्यांनीदेखील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. रायगड लोकसभा मागील निवडणुकीत ज्या केंद्रांवर 50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले, त्या केंद्रांवर जिल्हा प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. 2014च्या रायगड लोकसभा निवडणुकीत अनंत गीते 2100 मतांनी विजयी झाले होते, तर 2019च्या निवडणुकीत सुनील तटकरे 31 हजार मतांनी जिंकले होते. दोन्ही वेळेला सरासरी 60 टक्केच मतदान झाले होते. दोन्ही निवडणुकीत 30 हजार मतांच्या फरकाने उमेदवाराचा पराभव झाला. पण, आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बूथ यंत्रणा सक्षम करून मतदानाची टक्केवारी वाढवावीच लागणार आहे. जिल्ह्यातून स्थलांतर झालेले मतदार, मतदानादिवशी फिरायला गावी जाणारे मतदार, मतदानाला न येणारे मतदार यांच्यावर उमेदवारांना लक्ष ठेवावे लागणार आहे. त्याशिवाय विजयाचे समीकरण तंतोतंत जुळणार नाही, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी राजकीय पक्षांनी हालचाल केली नसली तरी प्रशासनाने मात्र जनजागृतीचे घोडे चौफेर उधळले आहेत. प्रशासन, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था, शिक्षक, विद्यार्थी यांच्यामार्फत रायगड लोकसभा मतदारसंघातील गावे, वाड्यावर लोकशाहीच्या उत्सवात सामील होण्याचे आवाहन करून मतदान करण्याबाबतची जबाबदारी समजावून सांगितली जात आहे. प्रत्येक लोकसभा निवडणुकीवेळी मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरु असते. मात्र, निवडणुकीच्या दिवशी मतदान टक्केवारी पाहिल्यावर त्यांचे प्रयत्न मतदान टक्का वाढविण्यात अपयशी ठरल्याचे पाहावयास मिळत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 2 लाख 63 हजार 356 पुरुष तर 2 लाख 76 हजार 121 महिला मतदारांनी मतदान करण्यासाठी पाठ फिरवली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 3 लाख 4 हजार 368 पुरुष आणि 3 लाख 27 हजार 4 महिला मतदारांनी मतदान केले नाही.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 64.73 टक्के आणि 2019 मध्ये मतदानाची टक्केवारी तीन टक्क्यांनी घसरून 61.77 टक्के एवढी कमी झाली होती. 2014 आणि 2019 च्या रायगड लोकसभा निवडणुकीत मतदानाचे कर्तव्य न बजावणार्या मतदारांची संख्या तब्बल 11 लाख 70 हजार 85 इतकी आहे. यामध्ये पेण विधानसभा मतदारसंघात एक लाख 99 हजार 640, अलिबाग विधानसभा मतदारसंघात एक लाख 90 हजार 194, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात एक लाख 85 हजार 619, महाड विधानसभा मतदारसंघात दोन लाख 15 हजार 81, दापोली विधानसभा मतदारसंघात दोन लाख 2 हजार 586 आणि गुहागर मतदारसंघातील एक लाख 77 हजार 732 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही.
केंद्रांवरील रांगांचाही मतदानावर परिणाम रायगड लोकसभा मतदारसंघातील 16 लाख 53 हजार 935 मतदारांसाठी यंदा 2185 मतदान केंद्रे आहेत. मतदानावेळी सकाळी आठ ते दुपारी एकपर्यंत मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा असतात. त्यानंतर कडक उन्हामुळे अनेकजण सायंकाळी पाचनंतर मतदानाला जाण्याचे नियोजन करतात. पण, अनेकांना जमतच नाही. दरम्यान, रोजगार तथा उदरनिर्वाहासाठी परजिल्ह्यात स्थलांतरित झालेले मतदार निवडणुकीवेळी येत नाहीत. अनेकजण सुट्टी असल्याने परगावी फिरायला जातात. अनेकजण आपल्या एका मताने काय होईल, या मानसिकतेमुळेदेखील येत नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे.
मतदानादिवशी खासगी कामगारांनाही सुट्टी रायगड जिल्ह्यात 2014 मध्ये जवळपास 15 लाख 29 हजार 728 मतदार होते, पण त्यातील 5 लाख 39 हजार मतदारांनी मतदानच केले नाही. 2019च्या लोकसभा निवडणुकीतदेखील 6 लाख 31 हजार मतदार मतदानापासून दूरच राहिले. यंदा मतदानादिवशी खासगी कामगारांनादेखील भरपगारी सुट्टी दिली जाणार असून, त्यादृष्टीने सर्व व्यावसायिकाना, कंपनी व्यवस्थापनांना जिल्हाधिकार्यांमार्फत आदेश पारित करण्यात आले आहेत.
नाराजीमुळे मतदानाकडे पाठ कामात व्यस्त असलेले लोक बुथ क्रमांक अथवा आपला मतदार क्रमांक जाणून घेण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेण्यास उत्सुक नसतात. यामुळेच काहीवेळा ते नाराज होऊन मतदान करण्यास जात नाहीत. यामुळे मतदानाची टक्केवारी घटत होती. उमेदवारांचे प्रतिनिधी जेव्हा मतदार चिठ्ठी मतदाराच्या घरी पोहोचवत होता, तेव्हा न आवडणार्या उमेदवारांना मतदान करण्याचा आग्रह मतदाराकडे धरला जातो. त्यामुळे तो साहजिकच मतदान करण्यास नाखुश असतो. त्यामुळे ते मतदानासाठी बाहेरच पडत नाहीत. मतदान हे लोकशाही प्रक्रियेतील आद्य कर्तव्य आहे. परंतु, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात अद्यापही मोठ्या संख्येने लोक मतदान प्रक्रियेपासून दूर असल्याचे गेल्या काही वर्षांतील मतदानाची टक्केवारी पाहिल्यानंतर स्पष्ट होते. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत झालेल्या लोकसभेच्या 16 निवडणुकांमध्ये कधीही 70 टक्के मतदारांनीही मतदान केले नसल्याचे स्पष्ट होते. 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक 66.73 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. स्वातंत्र्यापासूनचे सर्वात कमी मतदान पहिल्या दोन निवडणुकांमध्येच झाल्याचे दिसते. 1951च्या सार्वत्रिक निवडणुकीत 44.87 टक्के मतदान झाले होते. त्यानंतरच्या म्हणजे 1857 सालच्या निवडणुकीमध्ये 45.44 टक्के मतदान झाले. त्यानंतर मात्र सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढून 55 ते 65 टक्क्यांदरम्यान राहिली आहे. एकूण नोंदणीकृत मतदारांपैकी सरासरी केवळ 55-58% मतदार नियमित मतदानाचा हक्क बजावतात. म्हणजेच, अद्याप जवळपास निम्मा मतदार निवडणूक प्रक्रियेपासून लांब आहे. त्यातही नोंदणी झालेली नसलेल्या पात्र नागरिकांची गणना केलेली नाही अन्यथा हा आकडा आणखी वाढू शकतो. आता इतक्या मोठ्या वर्गाला मतदान प्रक्रियेत सामावून घेण्याचे आव्हान शासकीय-प्रशासकीय यंत्रणेपुढे आहे.
लोकसभेसाठी मतदान न केलेल्यांची संख्या
2014 मधील स्थिती
एकूण मतदार -15,29,728
मतदान न केलेल्या महिला – 2,73,121
मतदानाला न आलेले पुरुष – 2,63,356
एकूण – 5,39,477
2019 मधील स्थिती
एकूण मतदार – 16,51,560
मतदान न केलेल्या महिला – 3,27,004
मतदानाला न आलेले पुरुष – 3,04,368
एकूण – 6,31,375
किशन जावळे,
रायगड लोकसभा निवडणुकीवेळी 50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या गावांमध्ये किंवा केंद्र परिसरातील मतदारांमध्ये प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकार्यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. विधानसभानिहाय मतदान केंद्रांमध्ये मतदान जनजागृती करण्यात येत आहे. लोकशाहीत मतदानाला फार महत्त्व असून, प्रत्येकाने मतदान करायलाच पाहिजे.
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, रायगड