। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
दोन दिवसांपासून दमदार कोसळत असलेल्या पावसाची आजही रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरीकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी अलिबाग तालुक्यातील विजपुरवठा तब्बल पाच तास विजपुरवठा खंडीत झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते. त्यात अनेक अधिकार्यांचे फोन बंद असल्याने कोणीही सक्षम अधिकारी यांच्याशी संपर्क देखील होत नव्हता त्यामुळे तालुक्यातून संताप व्यक्त केला जात होता.
जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱी चिंतातूर होता. मात्र मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतीच्या कामांना पुन्हा एकदा वेग आला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात सरासरी 61 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अलिबाग येथे 116 मिमी, पेण येथे 72 मिमी, मुरुड येथे 104 मिमी, पनवेल 60 मिमी, उरण 103 मिमी, कर्जत 34 मिमी, खालापूर 50 मिमी, माणगाव 47 मिमी, रोहा 58 मिमी सुधागड 52 मिमी, तळा 61 मिमी, महाड 22 मिमी, पोलादपूर 41 मिमी, म्हसळा 36 मिमी, श्रीवर्धन 87 मिमी, माथेरान 32 मिली मीटर पावसाची नोंद झाली.
शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे सखल भागात पाणी साचणे, वीज पुरवठा खंडीत होणे, वृक्ष उन्मळून पडणे यासारख्या घटना घडल्या. हवामान विभागाने पावसाचा जोर आणखिन दोन दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरुवारी अलिबाग तालुक्यात सायंकाळी 7 नंतर विजपुरवठा खंडीत झाला तो मध्यरात्री 1 च्या सुमारास पुर्ववत झाला. यावेळी महावितरणच्या अधिकार्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे फोन बंद येत होते. त्यामुळे संताप व्यक्त केला जात होता. दुसर्या दिवशी देखील विजपुरवठा खंंडीत होण्याचा प्रकार कायम होता. पावसाळ्यापुर्वी कामं करण्यासाठी मोठया प्रमाणावर शट डाऊन घेऊन देखील पावसाळ्यात वारवांर विजपुरवठा खंडीत होत असल्याने मोठया प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे.