। पुणे । प्रतिनिधी ।
कधी धो धो,तर कधी मुसळधार,कधी रौद्ररुप तर कधी हाहाकार अशा स्वरुपात महाराष्ट्रासह अवघ्या देशावर जोरदार पर्जन्यवृष्टी करणार्या वरुणराजाला आता खरोखरच परतीचे वेध लागले आहेत. हवामान खात्यानेही 6 ऑक्टोबर ही परतीचा दिवस जाहीर केला आहे.त्यामुळे आता यावर्षीचा पाऊस परत माघारी फिरणार आहे.लहर आली तर अधूनमधून पुन्हा बरसणार आहे.हे नक्की.
यंदा अपेक्षेपेक्षा जास्त आणि सर्वांनाच धडा शिकवून वरुणराजा परत निघालाय.यंदाच्या मोसमात सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावली.अगदी ठरलेल्या नियोजित वेळेतच तो धरतीवर दाखलही झाला.थोडा बरसला आणि पुन्हा गायब झाला.आता वाटले पाऊस पडणार नाही.पण शेवटी तो निसर्गच.त्यानेही आपला लहरीपणा दाखविला आणि पुन्हा असा काही बरसला की, होत्याचे नव्हते करुन टाकले.
परशुरामाची भूमीच जलमय करुन टाकली.अनेक संकटे या पावसाळ्यात मानवावर आली.त्यातून निसर्गाने सर्वांनाच धडा शिकविला तो म्हणजे निसर्गाशी,धरतीशी कधीही प्रतारणा करु नका,नाहीतर आम्हाला मग असे रौद्ररुप दाखवावे लागते.
या जलप्रलयानंतर मध्यंतरी काही दिवस पावसाने विश्रांती घेतली खरी,पण त्यानंतर तो मात्र जो काही उसळून वर आला त्याने विदर्भ, मराठवाड्याला झोडपूनच काढले.त्याचे ते भयानक रौद्ररुप पाहून अवघा महाराष्ट्रच अचंबित झाला.आधीच कोकण,पश्चिम महाराष्ट्रातील जलप्रलयाने राज्यकर्ते हैराण झाले असतानाच पुन्हा एकदा मराठवाड्यातील जलप्रलयाने राज्यात हाहाकार उडवून दिला.तेथील जनतेला कसे वाचवायचे हाच मोठा गंभीर प्रश्न आजमितीस राज्यकर्त्यांना पडलाय. आता मात्र हवामान खात्यानेच वरुणराजाचा परतीचा प्रवास 6 ऑक्टोबरपासून सुरु होणार असल्याचा दावा केलाय.मात्र,त्यातूनही काय भरवसा या वरुणराजाचा.आली लहर तर पुन्हा केव्हाही,कुठेही तो बरसून जाईल,हे सांगणे कठीणच.