| उरण | वार्ताहर |
कोकणातील बहुप्रतिक्षित असणारा रेवस-करंजा पूल उभारण्यासाठी एमएसआरडीसीने निविदा मागवल्या होत्या. 15 कंत्राटदारांनी त्याला प्रतिसाद दिला होता. पैकी 11 निविदा पात्र ठरल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी 897 कोटी रुपये खर्चाचा 2.04 कि.मी. लांबीचा पूल लवकरच उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रवासासाठी लागणारा सुमारे दीड तासांचा अवधी हा केवळ 15 मिनिटांवर येणार आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले यांनी 1980 च्या दशकात रेवस-करंजा पुलाची प्रथम संकल्पना मांडून त्याला मंजुरी दिली होती. तसेच सुमारे 300 कोटी रुपयांची तरतूददेखील केली होती. मात्र, राजकीय अनास्था आणि प्रशासनाच्या पाठपुराव्याअभावी हा प्रकल्प चांगलाच रखडला. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा आणि अलिबाग तालुक्यातील रेवस ही दोन गावे खाडीच्या विरुद्ध टोकाला आहेत. करंजा-रेवस हे अंतर रस्ते मार्गाने पार करण्यासाठी प्रवाशांना फारच मोठी कसरत करावी लागते. यासाठी त्यांना तब्बल एक ते दीड तासांचा अवधी लागतो. त्यामुळे वेळेसह इंधन आणि पैशाचा अपव्यय होतो. मात्र, हेच अंतर सागरी मार्गाने पार केल्यास अवघा 15 मिनिटांचा कालावधी जातो. शिवाय, वेळ आणि इंधनाचीदेखील बचत होते. रेवस-करंजा हा पूल उभारल्याने हे अंतर फक्त 10 मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे हा पूल उभारणे सर्वांच्याच सोयीचे होणार आहे.
कोकणासाठी ‘माईल्ड स्टोन’
एमएसआरडीसीकडून निविदा अंतिम झाल्यावर धरमतर खाडीवर रेवस-करंजा पुलाच्या उभारणीला सुरुवात होणार आहे. 2.04 कि.मी. लांबीचा पूल उभारण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 897 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या पुलाच्या उभारणीमुळे मुंबईला अगदी कमी वेळेत पोहोचता येणार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यासाठीच नाही, तर कोकणासाठी हा पूल माईल्ड स्टोन ठरणार आहे.
जेएनपीए-मुरुड अंतर 36 कि.मी.ने कमी
करंजा-रेवसदरम्यान खाडी पूल झाला तर वाशी-रेवस हे अंतर 39 कि.मी.ने कमी होणार आहे. वाशी ते मांडवा हे अंतर 39 कि.मी., उरण-अलिबाग अंतर 44 कि.मी. आणि जेएनपीए-अलिबाग अंतर 35 कि.मी. कमी होणार आहे. जेएनपीए-मुरुड अंतर 36 कि.मी.ने कमी होईल. अलिबाग-मुंबई प्रवास करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करावा लागतो, हे अंतरही पुलामुळे कमी होणार आहे. प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ आणि जेएनपीए बंदराला जोडण्यासाठी हा पूल अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.