। नेरळ । प्रतिनिधी ।
कोरोनाने कर्जत तालुक्यातील पोशीर गावातील भगवान शेकटे या रिक्षाचालक तरुणाला ग्रासले आणि त्या महामारीमध्ये त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या पत्नीवर कुटुंब चालविण्याची जबाबदारी आलेली पाहून नाला सोपारा येथील सामाजिक बांधिलकी संघटनेने त्यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. मात्र तरी देखील घर कसे चालवावे याची गणित बसत नसल्याने शेवटी विधवा महिला भाग्यश्री भगवान शेकटे यांनी आपल्या पतीची रिक्षा चालवून कुटुंब चालविण्याचा निर्णय घेतला आहे. कळंब-नेरळ राज्यमार्ग रस्त्यावर त्या आता रिक्षा व्यवसाय करू लागल्या आहेत.
पोशिर या गावातील हे शेकटे कुटुंब पती भगवान शेकटे हे रिक्षा चालक होते. त्यांची स्वतःची रिक्षा होती. संपूर्ण प्रपंच हा रिक्षा व्यवसायावर चालला होता. रिक्षा चालवत असताना कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने शेकटे यांना कोरोना झाला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत दिनांक 17 मे 2021 रोजी मावळली. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, आणि चार मुले. कै. भगवान शेकटे यांच्या मृत्यू नंतर पत्नी भाग्यश्री यांच्या समोर असंख्य प्रश्न निर्माण झाले शेकटे कुटुंबाची परिस्थिती सामाजिक बांधिलकी संस्था नालासोपारा यांच्या निदर्शनास येताच संस्थेच्या टीमने भाग्यश्री शेकटे यांच्या घरी जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली असता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी संस्थेने घेतली या मुलांना वर्षभर पुरतील एवढं शैक्षणिक साहित्य तसेच ऑनलाइन शिक्षणासाठी दोन अँड्रॉईड मोबाईल दिले.
संस्थेचे मोठे योगदान
संस्थेचे एकच ध्येय होते आणि ते म्हणजे भाग्यश्री यांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे या साठी त्यांच्या पतीची असलेली रिक्षा चालविण्याचा पर्याय संस्थेने भाग्यश्री यांच्या पुढे ठेवला. मात्र या गोष्टी साठी विरोध होत असतानासुद्धा त्यांनी विरोध न जुमानता रिक्षा चालविण्यास संमती दर्शविली या नंतर कर्जत मधील पहिली रिक्षा चालक महिला निशा गुप्ता यांच्याशी संपर्क साधून त्यांना कर्जत येथे उत्तम दर्जाचेरिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण संस्थेने दिले त्यांना रिक्षा चालविण्यासाठी आवश्यक असणारे लायसन हे सुद्धा संस्थेने मिळवून दिले आहे.
.
आता आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी भाग्यश्री शेकटे पोशिर ते नेरळ, कळंब या मार्गाने रिक्षा चालवत आहे आणि या कमाईतून आपला प्रपंच चालवत आहेत आणि याचं समाधान त्यांना वाटत आहे की मी स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि तर सामाजिक बांधीलकी संस्थेमुळे त्यांच्या मुलांना शिक्षण देऊन योगदान दिले आहे. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार्या नालासोपारा येथील सामाजिक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कामेरकर व भागूचीवाडी शाळेचे मुख्याध्यापक हरीचंद्र आढारी यांचे देखील यानिमित्ताने कौतुक होत आहे.