सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन
| महाड | वार्ताहर |
कोकणासह राज्यात कुठलीही आपत्ती ओढवली की मदती साठी जाती पातीच्या भिंती पार करून सर्व प्रथम धावून मानवतेचा धर्म पाळणार्या महाड मधील अंजुमन दर्द मंदाने तालीम व तरक्की ट्रस्टच्या माध्यमातून जमियते उलमा हिंद दिल्ली या संस्थेमार्फत दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
दि 22 व 23 जुलै 2021 रोजी महाड तालुक्यात झालेल्या अति वृष्टीमुळे संपुर्ण महाड शहर एकिकडे पाण्याखाली बुडाले होते तर दुसरीकडे 22 जुलैच्या रात्री तळीये मधलीवाडी येथे मोठ्या प्रमाणात दरड कोसळून संपुर्ण गांव माती खाली गाडले. या दुर्घटनेत एकुण 84 जणांचा बळी गेला त्यापैकी 53 मृतदेह शोध पथकाच्या हाती लागले तर उर्वरित 31 बेपत्ता दुर्घटनाग्रस्थांना मृत घोषीत करण्यात आले. एकुण 40 कुटंबा पैकी 24 कुटुंबातील केवळ 77 जण या दुर्घटनेतून वाचले आहेत.महाड तालुक्यासह संपुर्ण कोकण व राज्यात कुठलीही आपत्ती आली की मदती साठी धावून जाणार्या आणि देश परदेशात असणार्या कोकणी मुस्लिम बांधव व संघटनांकडून आपत् ग्रस्तांसाठी सर्व प्रकारची मदत मिळवून देणार्या अंजुमन दर्दमंदाने तालीम व तरक्की ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून जमियते उलमा हिंद दिल्ली या संघटनेची एक टिमने तळीये गावात भेट दिली. यावेळी जमियते उल्मा हिंद दिल्ली चे सेक्रेटरी मौलाना हकीमुद्दीन कासीमी सदस्य मौलाना शफीक साहब, मौलाना जफर साहब, मौलाना जमाल साहब, हाफीज सरफराज साहब, अंजुमन दर्द मंदचे अध्यक्ष मुफ्ती रफीक पुरकर, हाफीज शकील इसाने आवाज ग्रुपचे सल्लागार हनिफ पुरकर आदी उपस्थित होते.
तळीये गावचे सरपंच व प्रतिष्ठीत नागरीक यांची भेट घेऊन अंजुमन दर्द मंदाने तालीम व तरक्की ट्रस्ट व जमियते उल्मा हिंद दिल्ली च्या टिमने तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांच्या गरजा काय आहेत या जाणून घेत त्याबाबत स्थानिकांशी विचार विनिमय केला. तळीये गावाला भेट देण्यापुर्वी या दोन्ही संस्थेच्या टिमने महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांची भेट घेऊन तेथील नुकसानीचा लेखा जोखा जाणून घेतला. जमियते उल्मा ए हिंद दिल्लीचे सेक्रेटरी मौलाना हकीमुद्दीन कासीमी यांनी अशा प्रकारचा महाप्रलय आपण गेल्या 36 वर्षाच्या कारकिर्दीत पाहिला नाही आपण कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यत दौरे केले मात्र या ठिकाणची भयावह परिस्थिती पाहून मन हेलावले आहे. आपत् ग्रस्त कुटुंबाना अन्न धान्याची मदत पोचत आहे त्यांना तातडीने भांडी व इतर आवश्यक साहित्य देण्याची व्यवस्था करण्यात येतील. या संघटनेच्या वतीने तळीये गावाला हवी ती मदत पुरवून सर्वो तोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले.