आ.जयंत पाटील यांचे आवाहन कृषीवल हळदी कुंकू सोहळा
। सलिम शेख । माणगाव ।
रशिया, युक्रेनमधील सुरु असलेल्या युद्धामुळे देशात महागाई भडकली आहे. त्याची मोठी झळ सर्वसामान्यांना बसत आहे. अशावेळी संसार नीटनेटका चालविण्यासाठी महिलांना कसरत करावी लागत आहे. अशा कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी शनिवारी (9 एप्रिल) गोरेगाव येथे केले.
कृषीवल परिवार आणि रमेश मोरे मित्रमंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अॅड.राजीव साबळे, अस्लम राऊत,शेकाप नेते रमेश मोरे,जि.प.सदस्या आरती मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
आ.जयंत पाटील यांनी छोटेखानी भाषणातून चित्रलेखा पाटील यांनी सुरु केलेल्या उपक्रमाचे कौतूक केल. युद्धजन्य परिस्थितीमुळे जीवनाश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले आहेत. गोडेतेल हे 400 रुपये किलोपर्यंत जाण्याची भीती आहे.अशावेळी महिलांना वाण म्हणून गोडेतेल द्या अशी सुचना आपण केली होती. त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाल्याने सर्वसामान्य महिलांना थोडा का होईना आधार मिळाला आहे. ग्रामीण महिलांचे जीवनमान उंचावले पाहिजे तरच त्यांची उन्नती होणार आहे. त्यासाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. सोनी मराठी वाहिनीने ग्रामीण भागातील कलावंताना संधी उपलब्ध करुन द्यावी, अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.सोनी मराठीतील कलावंत या सोहळ्यात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले. रमेश मोरे, आरती मोरे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने हळदीकुंकू सोहळा आयोजित केल्याबद्दल जयंत पाटील यांनी त्यांचे कौतुक केले.