। उरण । वार्ताहर ।
प्रशासकीय यंत्रणेच्या बेपर्वाईने उरणमधील शेतकरी रामनाथ रघुनाथ पाटील यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचे पूत्र पत्रकार अजित पाटील यांनी केला आहे. याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे.
खोपटे गावातील शेतकरी रामनाथ रघुनाथ पाटील यांचा कुटुंबियांसह शेतावर खरीपाची पेरणी करायला गेलेले असतांना चक्कर येऊन मृत्यू झाला. ज्या ठिकाणी पाटील यांची शेती आहे. त्या संपुर्ण खाडीतील शेतकर्यांना शेतीवर जाण्यासाठी बाजुच्या ऑल कार्गो लॉजिस्टीक या प्रकल्पाने किमान 12 ते 15 फुटांचा ट्रॅक्टर जाऊ शकेल एवढा रस्ता ठेवणे बंधनकारक असतांना देखील त्यांनी तो ठेवलेला नाही. त्यामुळे शेतावर चक्कर येऊन पडलेल्या त्यांना वेळेवर उपचारासाठी नेता आले नाही. शेतांच्या बांधांवरून उचलून आणून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी उरण तालुक्यातील सर्वच कंपन्यांनी त्यांच्या प्रकल्पाच्या चारही बाजुने शेतकर्यांना शेतीवर जाण्यासाठी किान 12 ते 15 फुटांचा रस्ता ठेवला जावा अशी मागणी अजित पाटील यांनी केली आहे.