महिला, ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश
| आपटा | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत गुळसुंदे हद्दीतील नागरिकांचां पाणीप्रश्न अखेर निकाली निघाला आहे. वीस वर्ष पाताळगंगेचा अशुद्ध पाणी पीत असलेल्या लाडिवली गावातील महिला, ग्रामस्थ आणि आदिवासी बांधवांसह ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था या स्वयंसेवी संस्थेच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्ष सातत्याने पाठपुरावा मोर्चे, उपोषण, आंदोलने करून जलजीवन मिशनमधील एक कोटी पंचवीस लाखाची योजना मंजूर करुन घेण्यात आली. यासाठी उद्भव स्त्रोत म्हणून पातळगंगा एमआयडीसीच्या जल वाहिनीतून ऐंशी मिलिमीटरचे कनेक्शन घेत गुळसुंदे ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, एम.आय डी.सी व संबंधित प्रशासकीय यंत्रणेला अखेर शुद्ध पाणी देण्यास भाग पाडले. एमआयडीसी कनेक्शनमुळे गुळसुंदे, अकुळवाडी, लाडीवली, चिंचेचीवाडी, डोंगरीवाडी, फलाटवाडी, लाडीवली आदिवासीवाडी येथील नागरिकांचा अशुद्ध व अनियमित पाणी प्रश्न निकाली निघाला आहे.
मागील दोन वर्ष सातत्याने पाठपुरावा करणार्या स्वयंसेवी संस्थेसह लाडीवलीतील महिला व आदिवासी ग्रामस्थांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. लाडीवलीतील महिला ग्रामस्थांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे. दरम्यान मंगळवारी उद्भव स्त्रोतातून टॅप जोडण्याचे काम रा.जी.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुनील मिटकरी यांनी केले. त्यापूर्वी पाठपुरावा करणार्या महिलांनी विधिवत पूजा करून नारळ फोेडला. आमचा अशुद्ध पाणीप्रश्न आम्ही सोडविला. आता नारळ कुणीही फोडा आमचं काही म्हणणं नाही, मात्र आम्ही चुकीचे लोकप्रतिनिधी निवडून दिले याची खंत वाटते अशा आशयाचे बॅनर लावून स्थानिक लोकप्रतिनिधींना एक प्रकारची चपराकच दिली आहे.
यावेळी शुभारंभ ठिकाणी उपअभियंता सुनील मिटकरी, रोशन पाटील, लाडीवली येथील सुरेखा वाघे, ज्योती पाटील, दर्शना म्हामनकर, नीता शेडगे, राजश्री म्हामनकर, नीता वाघे, आशा शेडगे, महेश पाटील, दत्तात्रय सावंत, मारूती पाटील, बाळा पाटील, रमेश राऊत, सुरेश वाघे, जयवंत पाटील, आदिवासी कार्यकर्ते राम पवार यांच्यासह इतर ग्रामस्थांनी केली आहे.
गुळसुंदेमधील पाणीप्रश्नांसाठी आम्ही विद्यमान आ.महेश बालदी यांच्याकडे गेलो. त्यावेळी त्यांनी आम्हा महिलांना सांगितले की तुम्ही मला मतदान केले नसल्याचे सांगत सहकार्य करण्यास नकार दिला. मग आम्ही महिलांनी स्वतःच आमच्या पाणी प्रश्नांसाठीचा लढा सुरू केला व यशही मिळाले. त्यामुळे गावाने केले ते राव करू शकले नाहीत याची प्रचिती आम्हाला आली.
सुरेखा वाघे
ग्रामस्थ लाडीविली