36 धरणं ओव्हरफ्लो; मराठवाड्यातल्या धरणांत 95 टक्के पाणीसाठा
मुंबई | प्रतिनिधी |
गुलाब चक्रीवादळाने राज्यात थैमान घातलं आहे. या चक्रीवादळाचा परिणाम हा राज्यातल्या मराठवाडा आणि विदर्भासारख्या दुष्काळप्रवण भागात दिसून आला. साधारण 11 लाख हेक्टर शेतजमीन या वादळामुळे उध्वस्त झाली असून उभी पिकं नष्ट झाली आहेत. मात्र, दुसर्या बाजूला मुसळधार पावसामुळे राज्यातल्या 36 हून अधिक धरणांमधला पाणीसाठा 100 टक्क्यांवर पोहोचला आहे.यामुळे यावर्षी उन्हाळ्यातही राज्याची तहान भागणार आहे.
गेल्या कित्येक वर्षांतली ही पहिली वेळ आहे, जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर धरणांतला पाणीसाठा 100 टक्क्यांवर गेला आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातल्या 3 हजार 267 धरणांमधला पाणीसाठा 83 टक्क्यांच्या वर पोहोचला आहे.
असा आहे जलसाठा
कोकण विभाग 95.05 टक्के,
अमरावती 85.03 टक्के,
औरंगाबाद विभाग 76.12 टक्के,
नागपूर विभाग 78.18 टक्के,
नाशिक 80.43 टक्के,
पुणे 87.75 टक्के,
मराठवाडा 95 टक्के
अधिक पाणीसाठा आहे.
महाराष्ट्रावर एकानंतर एक चक्रीवादळाची संकटं येतच आहेत. आधी निसर्ग, मग तोक्ते आणि आता गुलाब चक्रीवादळ. आम्ही अजूनही निसर्ग आणि तौते वादळाने झालेल्या हानीची नुकसान भरपाई देत आहोत. आणि आता विदर्भ-मराठवाडा भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. मराठवाड्यातल्या 10 जिल्ह्यांपैकी 7 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालं आहे.
विजय वडेट्टीवार,मदत आणि पुनर्वसन मंत्री