दगडी पिचिंगमुळे धरणाच्या उंचीत वाढ
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात रेल्वे पट्ट्यात असलेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी आणि या भागातील शेती सिंचनाखाली आणण्यासाठी पाली भूतीवली येथे धरण बांधण्यात आले. 2004 मध्ये या धरणाच्या जलाशयात पाण्याचा साठा झाला असून, या धरणाच्या मातीच्या बांधाला दगडी बांधकाम अधिक मजबूत व्हावे यासाठी दगडी पिचिंग करण्याचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, या दगडी पिचिंगमुळे धरणाच्या जलाशयात पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे.
कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यात कोणतीही नदी असल्याने या भागात सतत पाणीटंचाई असायची. पाली भूतीवली धरणाचे पाणी शेतीसाठी मिळावे यासाठी येथे शेतकर्यांची संघर्ष समिती काम करीत होते. त्या संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी सरपंच जवाहर देशमुख हे आज हयात नाहीत. त्याच धरणाच्या कालव्यांची कामे वेगाने व्हावीत यासाठी शासनाच्या पाटबंधारे विभागाने कोणतीही हालचाली केल्या नाहीत. कारण, कालवे व्हावेत यासाठी सरकारी यंत्रणा काम करताना दिसत नाही. त्यामुळे गेली 21 वर्षे धरणाच्या जलाशयात पाणीसाठा असून, पाणी शेतकर्यांना मिळत नाही. त्यात शेतीशिवाय तरणोपाय नाही यांची कल्पना सर्व तरुणवर्गाला आली आहे. त्यामुळे शासनाने कालव्यांची कामे पूर्ण करून शेतीसाठी या धरणाचे पाणी सोडण्यात यावे यासाठी शेतकरी आक्रमक आहेत.
मात्र, आता सरकारी यंत्रणा यांच्याकडून धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मातीचे बांध असलेल्या या धरणाची उंची वाढवून अधिकच पाणीसाठा उपलब्ध करून त्यांचा व्यावसायिक वापर करण्यासाठी पाटबंधारे खाते कामाला लागल्याचे दिसून येत आहे. सध्या धरणाच्या सांडव्याचं भिंतीचे तसेच मुख्य बांधाचे दगडी पिचिंगचे काम पाटबंधारे विभागाने पूर्ण करण्यावर भर दिला आहे. धरणाच्या मुख्य बांधावर पाण्याच्या भागात नव्याने दगडी पिचिंग करण्यात आले आहे. त्याचा परिणाम धरणाची उंची वाढण्यास मदत होत आहे. दुसरीकडे धरणाच्या सांडव्याचे उंचीदेखील वाढविण्यात आली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा नव्याने केलेल्या दगडी पिचिंगमुळे वाढू शकणार आहे. त्याचवेळी धरणाची मुख्य विहीर आणि त्या आजूबाजूचा परिसरदेखील मजबूत करण्यात आला आहे.
दुसरीकडे धरणाच्या चिंचवाडी भागात असलेल्या जमिनीतील माती बाहेर काढून त्या ठिकाणी लहान बंधारा बांधण्याच्या विचारात पाटबंधारे विभाग असल्याचे दिसून येत आहे. त्या भागात माती काढून तेथील लहान बंधारा बांधता आल्यास पाणी साठा वाढण्यासाठी येणारा खर्च अत्यल्प होण्याची शक्यता आहेत. त्यातून धरणाची पाणीसाठा क्षमतादेखील वाढू शकणार आहे. त्या भागात लहान धरण बांधल्यास पाली भूतीवली धरणाची क्षमता दुप्पट होऊ शकते. मात्र, पाणीसाठा वाढवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात पाटबंधारे खात्याने केली आहे. धरणाच्या मुख्य बांधाची उंची वाढवणे, त्या बांधावर दगड लावून धरण मजबूत करण्याची कामे सुरू आहेत. त्याचा परिणाम आगामी काळात धरणातील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे.