| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पावसाचे ढग आहेत. बहुतांश ठिकाणी सोसाट्याचा वारा,गारपीट आणि मध्यम सरींच्या पावसाने हजेरी लावला असून, शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच पुन्हा एकदा हवामान विभागाने राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा मुक्काम वाढणार असून, कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ठिकठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे.
ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील कमाल तापमानाचा पारा चांगलाच खाली आला आहे. कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सध्या पावसाचे ढग आहेत. त्यामुळे येत्या चार दिवसात वादळी वार्यासह हलक्या व मध्यम सरींचा पाऊस राज्याला दणका देणार आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच काही भागात गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबई ठाणे पालघर येथे मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. यावर्षी देशभरात मोठ्या प्रमाणात उष्णता होती. 50 दिवसांपेक्षा जास्त दिवस यावर्षी उष्णतेची लाट सक्रिय होती. त्यामुळं हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील पाणी प्रचंड तापल्यानं बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. त्यामुळं देशभरात बाष्पयुक्त ढग तयार झाले आहेत. परिणामी यंदा लवकर मान्सून येण्याची शक्यता आहे.
'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट?
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक,छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड,जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, जळगाव, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.