चार जणांचा मृत्यू
। महाड । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी (दि. 02) मध्यरात्री वीर रेल्वे स्टेशनजवळ उभ्या असलेल्या सहा जणांना भरधाव टोइंग व्हॅनने जोरदार धडक देत चिरडत नेले. या भीषण अपघातामध्ये महाडमधील चौघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
महाडमधील काही तरुण त्यांच्या स्कॉर्पिओने माणगाव दिशेने जात असताना त्यांच्या वाहनातील डिझेल संपल्याने ते महामार्गालगत उभे होते. त्याच दरम्यान मागून येणाऱ्या एका टोइंग व्हॅनने उभ्या असलेल्या या सहा जणांना जोरदार धडक देत जवळपास पाच ते दहा फूट फरपटत नेले. ही धडक इतकी जोरदार होती की त्यांची स्कॉर्पिओदेखील जवळपास पन्नास फूट लांब फेकली गेली. या भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
अपघाताचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. मृतांमध्ये सूर्यकांत सखाराम मोरे रा. नवेनगर, साहिल नथुराम शेलार आणि प्रसाद रघुनाथ नातेकर रा. कुंभारआळी, समीप सुधीर मींडे रा. दासगाव यांचा समावेश आहे. तर जखमी झालेले सुरज अशोक नलावडे व शुभम राजेंद्र मातळ या दोघांवर मुंबई येथे विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.