सलग सुट्ट्यांमुळे महामार्गांवर वाहतूक कोंडी

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे रायगडसह कोकणात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून, राज्यातील प्रमुख महामार्गांवर वाहतूक कोंडीचे भीषण चित्र पाहायला मिळत आहे. पेण-अलिबाग मार्गासह मुंबई-गोवा महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आधीच सूर्य आग ओकत असल्याने तापमानाचा पारा वाढत असल्याने अंगाची लाही लाही होत असल्याने पर्यटक त्रस्त झाले होते. त्यातच तासन्‌‍तास कोंडीत अडकून राहावे लागल्याने त्यांचे हाल झाले. वाढती वाहनसंख्या, अपूर्ण रस्ते कामे आणि नियोजनाचा अभाव यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे स्पष्ट झाले आहे.

पेण-अलिबाग या वर्दळीच्या मार्गावर दुपारपासून संध्याकाळपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली. तिनविरा, पोयनाड, वडखळ या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक वाहने एकाच ठिकाणी दोन-दोन तास अडकून राहिल्याने प्रवासी हैराण झाले. अलिबाग-वडखळ हा पाऊण तासाचा प्रवास दोन तासांहून अधिक वेळ घेऊ लागला. उन्हाच्या कडाक्यात कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले, मात्र वाहनांची संख्या मोठी असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणणे कठीण झाले.

नियोजनशून्य कारभार; प्रवाशांमध्ये नाराजी
रायगड जिल्हा पर्यटनासाठी महत्त्वाचा ठरत असताना, सुट्टीच्या दिवशी होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कोणतेही ठोस नियोजन नसल्याची टीका होत आहे. दरवेळी कोंडी होणार हे माहित असूनही उपाययोजना न केल्याने प्रवासी वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
रुंदीकरणाकडे दुर्लक्ष; अरुंद रस्त्यांची समस्या कायम
पेण-अलिबाग मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग असूनही रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी कायमची समस्या बनली आहे. काही महिन्यांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली असली तरी रुंदीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. विकासाच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात रस्त्याच्या कामांकडे दुर्लक्ष होत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरही कोंडीचा कहर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अर्धवट रस्ते कामांमुळे रायगड ते रत्नागिरी दरम्यान वाहतूक कोंडी झाली आहे. संगमेश्वर, धामणी, निवळी, हातखंबा, पाली, लांजा या ठिकाणी 2 ते 3 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. धामणी आणि सोनवी पुलाजवळील रखडलेल्या कामांमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. बुरंबीकरंबेळे दरम्यान झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अपूर्ण चौपदरीकरणामुळे स्थानिक आणि पर्यटकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर ‌‘ग्रिडलॉक'
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सलग सुट्ट्या, पर्यटकांची वाढलेली गर्दी आणि ‌‘मिसिंग लिंक' प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर व्हीआयपी हालचालीमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. लोणावळा घाट, खंडाळा बोगदा ते खालापूर टोलनाकादरम्यान 5 ते 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी ‌‘ग्रिडलॉक'ची स्थिती निर्माण झाली होती. वाहन बिघाड, बेशिस्त वाहनचालक आणि अरुंद घाट रस्ते यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली होती.
बोरघाटात रांगा
बोरघाट परिसरात अमृतांजन पुलापासून खोपोली एक्झिटपर्यंत 7 ते 8 किमी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घाट सेक्शन पार करण्यासाठी एक ते दीड तासांचा कालावधी लागत असून वाहतूक कासवगतीने सुरू होती. महामार्ग पोलीस, आयआरबी आणि इतर यंत्रणा वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असल्या तरी वाहनांची वाढती संख्या आणि घाटात वाहन बिघाडाच्या घटनांमुळे कोंडीत आणखी भर पडत होती. एकूणच, वाढती पर्यटकांची गर्दी, अपूर्ण रस्ते कामे आणि नियोजनाचा अभाव यामुळे राज्यातील प्रमुख महामार्गांवर वाहतूक कोंडीचे संकट तीव्र झाले असून, प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
Exit mobile version