अलिबाग-बेलकडे मार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका

प्रवासी त्रस्त; निश्चित स्थळी पोहचण्यास एक तास उशीर

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग-बेलकडे मार्गावर शनिवारी (दि.9) सकाळपासून दुपारपर्यंत वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांना बसला. सकाळी निश्चित स्थळी पोहचण्यासाठी प्रवाशांसह कामगारांना एक ते दीड तास उशीर झाला. पाच मिनीटाचे अंतर कापण्यासाठी त्यांना एक तास लागल्याचे समोर आले आहे. वाहतूक कोंडी झाली असताना एकही वाहतूक पोलीस घटनास्थळी दिसून आला नाही. त्यामुळे प्रवासी वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली. काही स्थानिकांनी पुढाकार घेत स्वतःहून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

अलिबाग-सहाण बायपासपर्यंत रस्त्याचे काम सध्या सुरु आहे. ठिकठिकाणी काँक्रीटीकरण व खोदकाम करण्यात आले आहे. मात्र नियोजनशून्य कामाचा फटका बेलकडे ते अलिबाग मार्गावर प्रवाशांना सातत्याने बसत आहे. शनिवारी (दि.9) सकाळी अकरा ते दीड वाजण्याच्या सुमारास बेलकडे ते कुरुळ-रेवदंडा बायपास या तीन किलो मीटरच्या अंतरापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. येणा-जाणाऱ्या वाहनांना मार्ग मिळत नव्हता. त्यामुळे अनेक वाहने तासनतास एकाच ठिकाणी ताटकळत उभी राहिली होती. सकाळी व दुपारच्या दरम्यान निश्चित स्थळी पोहचण्यासाठी प्रवाशांना दीड तास लागला. अलिबाग ते बेलकडे हे दहा मिनिटाचे अंतर तसेच बेलकडे ते कुरुळ हे पाच मिनिटाचे अंतर कापण्यासाठी एक ते दीड लागला. एका बाजूला उन्हाचा चटका बसत असताना दूसऱ्या बाजूला वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त झाले होते. अनेकांनी प्रशासनासह वाहतूक पोलिसांच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी निर्माण केली. वाहतूक कोंडी झाली असताना कुरुळ ते बेलकडे मार्गावर एकही पोलीस दिसून आला नाही. त्यामुळे अनेकांनी खंत व्यक्त केली. त्यामुळे कार दुचाकीवरील काही मंडळींनी पुढाकार घेत वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला. काहींनी कुरुळ मैदानमार्गे गावातून रस्ता काढला. तर काहींनी मिळेल तो मार्ग स्विकारत निश्चित स्थळी पोहचण्याचा प्रयत्न केला. काही बेशिस्त चालकांमुळेदेखील अन्य प्रवाशांना वाहतूक कोंडीला समोरे जावे लागले.

Exit mobile version