गरोदर मुलीसह आदिवासी महिलांना आटपाटी सांगलीत ठेवले डांबून

माणगाव पोलिसांची तक्रार घेण्यास टाळाटाळ
रायगड पोलिसांकडे सर्वहाराची तक्रार

अलिबाग | भारत रांजणकर |

सांगली जिल्ह्यातील आटपाटी तालुक्यातील करदणी येथे कोळसा भट्टीच्या कामासाठी गेलेल्या माणगाव तालुक्यातील रातवड येथील आदिवासी कुटुंबाला डांबून ठेवून त्यांना कामाचा मोबदलाही दिला नाही. याची तक्रार घेण्यास टाळाटाळ माणगाव पोलीस करत असल्याने या सर्व प्रकाराबाबत सर्वहारा संघटनेच्या नेत्या उल्का महाजन यांच्यासह पीडीत आदिवासी कुटुंबाने जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांना निवेदन दिले आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनानुसार मोतीराम सखाराम पवार रा‌. रातवड आदीवासीवाडी ता. माणगाव जि. रायगड. यांचे सहा माणसाचे कुटुंब यांना दत्ताहाके भगवान रा. करदणी ता.आटपाटी जि. सांगली येथे कोळसा भट्टीच्या कामावर ऑक्टोबर २०२० मधे घेऊन गेले. कोळसा भटटीवर काम करण्याचा दर गोणीचा १२० रुपये असा ६०० गोणीचे रुपये ७२ हजार होतात. त्या नंतर आम्ही वाळु/रेती काढण्याचे पर ट्रॅक्टर १ हजार रुपये असे २४० ट्रॅक्टरचे २ लाख ४० हजार रुपये होतात तर काही दिवस ऊस तोडीचे काम माझे कुटुंबानी २१ हजार ६०० रुपयाचे केले आहे असे एकूण सप्टेंबर २०२१ पर्यंत अकरा महिन्यांत आम्ही हे काम सकाळी पहाटे पाच वाजले पासुन सायंकाळी सात वाजेपर्यंत एकुण रुपये ३लाख ३३ हजार ६०० चे काम केले आहे.
तसेच शेठकडून उचल ,खर्ची वगैरे एकुण ८० हजार रुपये घेतले आहेत. त्यानुसार शेठकडून २ लाख ५३ हजार ६०० रुपये येणे आहेत.
मात्र शेठ हिशोब ही करत नाही. व केलेल्या कामाचा मोबदला ही देत नाही, व जादा काम शेठ करायची सक्ती केली जात आहे.
तसेच मोतीराम याच्या दोन अविवाहित मुलींचा (वय 16 व 13) या दोघी दि.२४ सप्टेंबर २०२१ रोजी सांगली
येथे आकस्मित मयत झाल्या.
दोघींची प्रेते विहिरीत सापडली.
त्यांचा तपास संबंधित पोलिस करत आहेत. आपल्या या मुलींचे कार्य करणेसाठी गावी रातवड ता. माणगाव येथे येताना माझी मोठी मुलगी गरोदर असल्याने तीलाही आमचे सोबत पाठवा विनंती करुन सांगत असतानाही शेठ यानी तीला न पाठवता जबरदस्तीने तिथेच कामाच्या ठिकाणी अडकवून ठेवले आहे मुलीला डॉक्टरकडे जायला पैसे ही देत नाही.
तिची परिस्थिती गंभिर आहे तसेच त्यांचे साडूची पत्नी व मुलांना ही याच शेठने जबरदस्तीने तेथे अडकवून ठेवले आहे व दमदाटी करत आहेत.
हा अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे तसेच आगाऊ पैसे देऊन कामाला बांधून घेणे व किमान वेतन देखील नाकारणे ही वेठबिगारी आहे. व हा देखील गंभीर गुन्हा आहे. याबाबत दिलेली ही सदर फिर्याद माणगाव पोलिस ठाणे येथे देण्यास गेले असता व ० नंबरने तक्रार दाखल करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली. मात्र सदर फिर्याद न घेता सांगली येथे फिर्याद द्या असे सांगित टाळाटाळ करण्यात आली. याबाबत गुन्हा दाखल करून आदिवासींना न्याय देण्याची मागणी सर्वहारा संघटनेच्या वतीने मोतीराम पवार, उल्का महाजन, चंद्रकांत गायकवाड, सोपान सुतार यांनी केली आहे.

Exit mobile version