साडेतीन महिन्यानंतरदेखील आरोग्य विभागावर कारवाई नाहीच
| कर्जत | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत चुकीची औषधे दिल्याने चौथीमध्ये शिकणार्या आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दुर्दैवी खुशबू हिच्या मृत्यूनंतर तब्बल साडेतीन महिने उलटले असून, याप्रकरणी शासनाने अद्यापपर्यंत आरोग्य विभागवार कोणतीही कारवाई केलेली नाही. दरम्यान, खुशबू नामदेव ठाकरे हिच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या यंत्रणेवर कारवाई व्हावी यासाठी उद्या पेण शहरात आदिवासी धडकणार आहेत.
पेण तालुक्यातील तांबडी गावातील आदिवासी नऊ वर्षाची मुलगी तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत शिकत होती. तेथील आश्रमशाळेत 16 डिसेंबर रोजी झालेल्या कुष्टरोग निर्मूलन कुसुम या कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या हिवताव कुष्ठरोग निर्मूलन पथक यांनी चौथी मध्ये शिकणारी खुशबू नामदेव ठाकरे हिला कुष्ठरोगी ठरवले होते. त्यानंतर कुष्ठरोगावरील गोळ्या घेतल्यावर खुशबूचे अंगावर फोडी आल्या आणि नंतर ताप तसेच अंग सुजू लागल्याने पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तेथे उपचार सुरु करण्याआधी कुष्ठरोग निर्मूलन करण्याच्या गोळ्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर उपचार घेत असताना खुशबू ठाकरे हिचा 22 जानेवारी रोजी मृत्यू झाला होता. नऊ वर्षाच्या खुशबू हिला त्यापूर्वी कोणताही आजार नव्हता आणि तसे असताना खुशबूला कुष्ठरोगी ठरवून तिला गोळ्या देण्यात आल्या आणि त्याचा परिणाम तिच्या अंगावर फोड्या तसेच अंग सुजू लागल्याने चुकीची निदान केल्याने खुशबूचा बळी गेला आहे.
अर्थसंकल्पू अधिवेशन सुरु असतानाच पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अजित गंगाराम पवार आणि त्या आश्रमशाळेच्या महिला अधीक्षिका सुवर्णा वरगने यांना कामात कसूर केल्याबद्दल निलंबित केले आहे. हा आदेश आदिवासी विकास विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे खुशबू ठाकरे हिचा मृत्यू हा शासनाच्या हलगर्जीपणा यामुळे झाला असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात सुदृढ मुलीला कुष्ठरोगी ठरवून चुकीचे निदान करून तशी औषधे देणार्या आरोग्य विभागाच्या अधिकार्यांवर कारवाई कधी होणार? याकडे आदिवासी समाजाचे लक्ष लागून राहिले आहे.
आरोग्य विभागावर कारवाई कधी?
कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक यांच्याकडून खुशबूला चुकीची औषधे दिली आहेत, असा दावा ग्राम संवर्धन समिती तसेच आदिवासी संघटना यांनी केला आहे.त्यामुळे आरोग्य विभागाने चुकीची औषधे दिल्याने जीव गमावावा लागलेल्या खुशबूच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी उद्या 6 मे रोजी पेण शहरात मोर्चा काढला जाणार आहे.