गटारी अमावस्येला केळव्यात अपघात

। पालघर । प्रतिनिधी ।

पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस स्टेशन हद्दीतील दांडाखाडी पुलाच्या वळणावर रविवारी (दि.4) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या अपघातात चौघे जण जखमी गंभीर जखमी झाले आहेत.

रविवारी सर्वत्र गटारी अमावस्येची धामधूम असतानाच केळवा भागातील दांडाखाडी पुलाच्या वळणावर रात्री भरधाव वेगाने जाणार्‍या दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भयंकर होता की, यात पाठीमागून डबलसिट येणारे आणखी एक दुचाकीस्वारदेखील रस्त्यावर पडले. या अपघातात केळवे येथील नावेश भांडार (27) आणि नागेश भांडार (32) तसेच दांडा गावातील जयेश बारी (30) व प्रतिक बारी हे चौघे जखमी झाले आहेत. तर, तिसर्‍या दुचाकीवरील दोघांना किरकोळ दुखापत झाली असून ते तेथून निघून गेले.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह केळवा सागरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. यातील किरकोळ जखमी असणार्‍या तिघांना सरकारी तर पायाला फ्रँक्चर असणार्‍या एकाला खासगी रूग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी केळवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Exit mobile version