। सुधागड-पाली | प्रतिनिधी ।
सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील तलाठी कार्यालयाकडून दलव्यातळीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी (दि. 24) सकाळी सुमारे पावणेआठ वाजण्याच्या सुमारास, सुरू असलेली विद्युत वाहिनी अचानक तुटून रस्त्यावर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत दोन कुत्र्यांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने याच मार्गाने शाळेसाठी निघालेली एक आजी आणि तिचे दोन नातवंडे थोडक्यात बचावल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, दलव्यातळी येथील दोन शालेय विद्यार्थी आपल्या आजीसोबत शाळेसाठी निघाले होते. त्यांच्यामागे नेहमीप्रमाणे दोन कुत्रीही चालत होती. त्याचवेळी अचानक सुरू असलेली विद्युत तार तुटून रस्त्यावर पडली. आजी व दोन्ही नातवंडे तार पडलेल्या ठिकाणापासून पुढे गेल्याने ते बचावले. मात्र, त्यांच्या मागून येणाऱ्या दोन्ही कुत्र्यांच्या अंगावर ही विद्युत तार पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या विद्युत वाहिनीची अवस्था धोकादायक असल्याबाबत यापूर्वी संबंधितांकडे तक्रार करण्यात आली होती, मात्र त्याची वेळीच दखल घेऊन दुरुस्ती करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. वेळेत विद्युत वाहिनीची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात आली असती, तर ही दुर्घटना टाळता आली असती, अशी नाराजीही ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या घटनेबाबत ग्रामस्थ ज्ञानेश्वर कदम यांनी सांगितले की, “विद्युत वाहिनी धोकादायक अवस्थेत असल्याबाबत यापूर्वी संबंधितांकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र, त्याची वेळीच दखल घेऊन दुरुस्ती करण्यात आली नाही. सोमवारी सकाळी सुरू असलेली विद्युत तार अचानक रस्त्यावर तुटून पडली आणि दोन मुक्या प्राण्यांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने त्यावेळी आजी आणि तिचे दोन नातू त्याच रस्त्याने जात होते; मात्र ते थोडक्यात बचावले. हीच तार त्यांच्या अंगावर पडली असती तर मोठी जीवितहानी झाली असती. त्यामुळे महावितरणने या घटनेची गंभीर दखल घेऊन जांभुळपाड्यासह परिसरातील सर्व विद्युत वाहिन्यांची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी. भविष्यात अशा दुर्घटनांमध्ये कोणत्याही नागरिकाचा जीव धोक्यात येणार नाही, यासाठी महावितरणने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.”
दरम्यान, जांभुळपाड्यासह परिसरातील गावांमध्ये विद्युत वाहिन्या, खांब आणि इतर विद्युत यंत्रणेची तातडीने पाहणी करून धोकादायक स्थितीतील वाहिन्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी महावितरणने देखभाल-दुरुस्तीची प्रभावी मोहीम राबवावी आणि नागरिकांच्या जीविताला असलेला संभाव्य धोका दूर करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जांभुळपाड्यात विद्युत तार तुटून दोन कुत्र्यांचा मृत्यू
