नेरळ | वार्ताहर |
नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील नेरळ गावातील मोहचीवाडी आणि त्या भागातील समाधान नगर या चाळीत राहणार्या 20 हून अधिक गृहिणी महिलांना पिण्याचे पाणी मागण्याच्या बहाण्याने तसेच लहान मुलं रडत आहे असे बहाणे करून घरात घुसून चोर्या केल्या आहेत.त्यातील 13 गृहिणी असलेल्या महिलांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या होत्या. त्या महिलांची फसवणूक करणार्या दोन महिलांना पुणे येथून आणून त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत करतानाच त्यांना एक वर्षाची सजा देण्याची किमया नेरळ पोलिसांनी केली आहे.
नेरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मोहाचीवाडी येथे भांडी विक्रीसाठी आलेल्या दोन महिलांनी समाधान चाळ आणि साईमंदीर परीसरातील सुमारे 18 ते 20 महिलांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. आमच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने चोरले असल्याची तक्रार गावातील महिलांनी नेरळ पोलीस दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत नेरळ पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तीन दिवसात या गुन्ह्याचा तपास लावत या दोन महिलांना बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सचिन गावडे आणि त्यांच्या पथकाने केलेल्या दमदार कामगिरीमुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. न्यायालयाने या महिलांना एक वर्षाचा कारावास आणि 18 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आणि उपविभागीय पोलीस अधीकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, पोलीस उपनिरीक्षक सचीन गावडे, सहा. फौजदार गणेश गिरी, पोलीस हवालदार नवनाथ म्हात्रे, पोलीस नाईक संदीप चव्हाण यांनी हि कामगिरी पार पाडली आहे. या गुन्ह्याचा जलदगतीने तपास करून मुद्देमाल परत केल्याबद्दल फिर्यादी यांनी नेरळ पोलिसांचे आभार मानले आहेत.