| मुंबई | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री उशिरा आपल्या पदाचा तसेच विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. यामुळे गेले पंधरा दिवस चालू असलेल्या राजकीय नाटकाचा एक अंक समाप्त झाला. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी 2019 मध्ये एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारची समाप्ती झाली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारला गुरुवारी विश्वासदर्शक ठराव मंजूर करुन घेण्याचे आदेश दिले होते. परंतु त्याची आता गरज उरलेली नाही. आता भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील फुटीर गट हे एकत्र येऊन कशा रितीने सरकार स्थापन करतात हा औचुक्याचा विषय झाला आहे. दरम्यान, रात्री उशिरा शिवसेना नेते अनिल परब यांनी राजभवनवर जाऊन मुख्यमंत्र्यांचे राजीनामा पत्र सादर केले.
माझ्याच लोकांनी दगा दिला – ठाकरे
अखेरच्या भाषणात ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे मनापासून आभार मानले. माझ्याच लोकांनी मला दगा दिल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मी सांगतो, उद्या कुणीही शिवसैनिकांनी यांच्या अधेमधे येऊ नये. उद्या नव्या लोकशाहीचा पाळणा हलतोय. त्यांचे पोलीस दल, इतर फोर्स, इतर देशातून सैन्य आणणार असतील, तर आणू द्या. हा सोहळा जबरदस्त झाला पाहिजे. तुमच्या मार्गात कुणीही येणार नाही. तुम्ही या आणि घ्या शपथ. असे भावनिक आवाहनही ठाकरे यांनी केले.
हे लोकशाहीचं दुर्दैव आहे की इथे डोक्याचा वापर फक्त मोजण्यासाठीच होतो की कुणाकडे किती बहुमत आहे. माझ्या विरोधात किती आहेत, यात मला रस नाही. पण एक जरी माझा माणूस उभा राहिला तर ते मला लज्जास्पद आहे. मला बहुमताचा खेळच खेळायचा नाहीये. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की ज्यांना शिवसेनेनं राजकीय जन्म दिला, शिवसेना प्रमुखांनी मोठं केलं, त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्याचं पुण्य यांच्या पदरात पडत असेल तर ते पडू द्या. त्यांच्यावर विश्वास ठेवला हे पाप माझं आहे. त्याची फळं अशी भोगावी लागत असतील, तर त्यात त्यांचा काय दोष आहे. उद्या ते अभिमानानं सांगतील की बघा आम्ही शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला खाली खेचलं की नाही, असेही ते म्हणाले. सगळं अनपेक्षित घडतंय. मी आलोच होतो अनपेक्षितपणे. जातोही अनपेक्षितपणे. पण मी कुठेही जात नाहीये. मी पुन्हा एकदा शिवसेना भवनात बसायला सुरुवात करणार आहे. पुन्हा शिवसैनिकांना भेटायला सुरुवात करणार आहे. पुन्हा तुम्हा सगळ्यांना सोबत घेऊन शिवसेनेची नवीन वाटचाल करणार आहे. शिवसेना तीच आहे. शिवसेना आपल्यापासून कधीही कुणी हिरावून घेऊ शकत नाही. आपण इथेच आहोत. मुख्यमंत्रीपदाप्रमाणेच विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देतो आहे. असे त्यांनी जाहीर केले.