अन्नपाण्याची कमतरता गुरांचे होताहेत हाल; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
उन्हाचा तडाखा सर्वत्रच वाढला आहे. अशातच जनावरांसाठी हिरव्या व सुक्या चार्याचादेखील अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकाट जनावरांना खाण्यासाठी अन्नपाण्याची कमतरता भासू लागली आहे. मग ही मोकाट गुरे पालीत डम्पिंग ग्राऊंड व उकिरड्यावर जाऊन मिळेल ते खात आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय, स्वच्छतेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे.
येथील डम्पिंग ग्राऊंडवर तसेच जुने पोलीस स्थानक, मधली आळी, बल्लाळेश्वर मंदिर, बल्लाळेश्वर नगर व मराठी शाळा आदी ठिकाणी उकिरड्यावर सकाळपासूनच मोकाट गुरांची गर्दी असते. येथे टाकलेला कचरा ही गुरे अस्ताव्यस्त करतात, त्यामुळे येथे घाण व दुर्गंधी पसरते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्यदेखील धोक्यात येते. बर्याचवेळा टाकून दिलेले अन्नपदार्थ पिशव्यांमध्ये असते. परिणामी, गुरांच्या पोटात कमी-अधिक प्रमाणात प्लास्टिक जाते. प्लास्टिक व सडके आणि कुजलेले अन्नपदार्थ खाऊन या जनावरांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. त्यांची पचनशक्ती मंदावते, अन्नाच्या शोधात सतत चालल्याने त्यांची ऊर्जा कमी होते. अशक्तपणा येतो. डम्पिंग ग्राऊंड व उकिरड्यावरील कचर्यात धातू तसेच अनुकूचिदार वस्तू उदा. घरगुती वापराच्या वस्तू, काचेच्या वस्तू व इंजेक्शनच्या सुया आदी घटक असतात. त्या पोटात गेल्यामुळे जनावरांच्या जठराला व अन्ननलिकेला इजा पोहोचते. सतत प्लास्टिक खाल्ल्यामुळे ते त्यांच्या पोटात साठते, त्यामुळे गुरे मरतातदेखील. काही वेळेस अशा मेलेल्या गुरांची हाडे इतर गुरे आणि प्राणी चघळतात व पर्यायाने त्यामुळे त्यांचादेखील मृत्यू होतो. आणि हे दुष्टचक्र सुरूच राहते.
चारापाण्याची व्यवस्था करावी
उष्म्याने जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शेतकरी किंवा गुरेपालक यांनी आपली गुरे चरण्यासाठी मोकाट सोडू नयेत. शासनाने मोकाट गुरांच्या चारापाण्याची व्यवस्था केली पाहिजे किंवा पशुपालकांना यासाठी अनुदान दिले पाहिजे. नागरिकांनी रस्त्याच्या कडेला कचरा न टाकता घंटागाडीतच कचरा टाकावा. जेणेकरून गुरे तेथे येणार नाहीत.
जनावरे मोकाट सोडू नये
शेतकर्यांनी व पशुपालकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नये. त्यांना पेंढा किंवा सुके गवत खाऊ घालावे. कचर्यात किंवा उकिरड्यावर टाकलेले अन्नपदार्थ खाऊन गुरांची पचनक्रिया बिघडते. मानवी खाद्य हे जनावरांसाठी नाही. वारंवार प्लास्टिक पोटात गेल्याने ते पोटात साठून गुरांचा मृत्यूदेखील होऊ शकतो. शहरी तसेच ग्रामीण भागात निसर्गपूरक जीवन अंगिकारणे गरजेचे आहे.